कट्टर विरोधक एकाच मंचावर, शरद पवार-राधाकृष्ण विखेंचा संवाद नितीन गडकरी घडवणार?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे.
अहमदनगर : राजकारणातील पारंपारिक कट्टर विरोधक एकाच मंचावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे शनिवारी ऑक्टोबरला नगरमधील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसणार आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे आणि शरद पवारही एकच मंचावर येणार असल्याने नगरच्या राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चांना उधाण आलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या 3 हजार 28 कोटी महामार्गाचे भूमीपूजन तर 1 हजार 46 कोटी लोकार्पण सोहळा होत आहे. याच सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार, नितीन गडकरी आणि विखे परिवार एकाच मंचावर येणार असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. शनिवारी 10.45 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत.
नगर परिसरातील कोणकोणत्या विकासकामांचं भूमीपूजन?
नगर-करमाळा-टेंभुर्णी या चौपदरी रस्त्यासाठी मोठा निधी, सावळीविहीर ते अहमदनगर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ४९६ कोटी, अहमदनगर- भिंगार या १८ किलोमीटर रस्तारुंदीकरणासाठी ३५ कोटी रुपये, तर राष्ट्रीय राखीव निधीमधील कामांसाठी ८४ कोटी रुपये खर्च होत आहे.
या कामांचे भूमिपूजन होणार आहे. अहमदनगर-दौड-वासुंदे फाटा रस्ता मजबुतीकरण, अहमदनगर-कडा-आष्टी-जामखेड रस्ता मजबुतीकरण, नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्ता मजबुतीकरण व कोपरगाव-वैजापूर रस्ता मजबुतीकरणाची कामे पूर्ण झाली असून, त्यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केडगावजवळील सोनेवाडी रस्त्यावरील श्रेया गार्डन येथे मुख्य कार्यक्रम होत आहे.
लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध विखे संघर्ष
शरद पवार आणि विखे पाटील घराण्यातील वाद जुना आहे. मात्र हा वाद आताच्या पिढीमध्येही आल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीवेळी नगरची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवारांनी नकार दिला होता. मात्र या जागेसाठी सुजय विखे पाटील यांनी आग्रह धरला होता. आघाडीत बिघाडी झाली तरी चालेल, पण नगर दक्षिणची जागा काँग्रेससाठी सोडणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. त्यामुळे राष्ट्रवादीने जागा न सोडल्यामुळे सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवली. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव केला होता. त्यावेळी पवार आणि विखे घराण्यातील टोकाचा संघर्ष दिसला होता.
काय आहे विखे वि. पवार वाद?
शरद पवार आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून संघर्ष चालत आला होता आणि त्यांच्यात दोन गट होते. पण 1991 च्या लोकसभा निवडणुकीत हा वाद खऱ्या अर्थाने पेटला. या निवडणुकीत नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखेंना टाळून काँग्रेसने यशवंतराव गडाख यांना दिली होती. अर्थात शरद पवारांनीच ही जागा गडाखांना मिळावी यासाठी जोर लावल्याचं बोललं जातं. बाळासाहेब विखे पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढले. या निवडणुकीत बाळासाहेब विखेंचा पराभव झाला. पण स्वतःच्याच जिल्ह्यात झालेला हा पराभव बाळासाहेब विखेंच्या जिव्हारी लागला होता.
बाळासाहेब विखेंनी आचारसंहितेचा धागा पकडत विजयी उमेदवार यशवंतराव गडाख यांच्याविरोधात तक्रार केली. या निवडणुकीत जात आणि धर्माच्या आधारावर मतं मागितली गेल्याचा त्यांनी आरोप केला. बाळासाहेब विखेंनी या प्रकरणी पुरावे जमा केले, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि आरोपी होते यशवंतराव गडाख, तर सहआरोपी म्हणून शरद पवारांचं नाव होतं. शरद पवार या प्रकरणातून यशस्वीरित्या बाहेरही पडले होते.
पुढच्या पिढीतही वाद चालूच
बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यातला वाद उभ्या महाराष्ट्राला परिचित असला तरी हा वाद मात्र दुसऱ्या पिढीतही सुरु आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातही फार सौख्य नाही. सुजयला नातू समजून पवारांनी जागा सोडावी, असं विखे पाटील म्हणाले होते. पण ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
पुन्हा एकदा 1991 सारखी लढत?
नगर दक्षिणेत राष्ट्रवादीकडून प्रशांत गडाख यांच्या नावाची चर्चा होती. शरद पवारांनी गडाख अस्त्र बाहेर काढल्याची चर्चा होती. जर प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळाली, तर विखे विरुद्ध गडाख लढाईची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकणार होती. कारण यशवंतराव गडाखांनी स्वर्गीय बाळासाहेब विखेंचा पराभव केला होता. 1991- च्या लोकसभा निवडणुकीत विखे गडाख खटला देशभरात गाजला होता. हा वाद प्रत्येक राजकारणात पाहायला मिळाला. त्यानंतर शरद पवार आणि विखे पाटील घराण्यात हा वाद आला. जर सुजय विखेंनी इथे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आणि राष्ट्रवादीने प्रशांत गडाख यांना उमेदवारी दिली तर हा वाद आणखी ताणण्याची शक्यता होती. पण राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. सुजय विखे यांनी त्यांचा पराभव केला होता.
संबंधित बातम्या
विरोधी पक्षनेता ते मंत्री… विखेंचा चौथा नंबर, सुरुवात तर पवारांपासून!
बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातला वाद नेमका काय आहे?
पंकजा मुंडेंच्या नवऱ्याला आणि सुजय विखेंच्या पत्नीला कोण फोडतंय?