ना फडणवीस ना अजित दादा, शिंदेही नाही, विधानसभेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शिंदे गट झाला नाराज

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एकूण 288 जागांपैकी किमान 160 जागांवर दावा करेल. 160 जागांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.

ना फडणवीस ना अजित दादा, शिंदेही नाही, विधानसभेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शिंदे गट झाला नाराज
सोलापुरात राष्ट्रवादीत गटबाजी, अजित पवार संतापले, मोहोळमध्ये नेमकी राजकीय स्थिती काय?
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar | Updated on: Jul 21, 2024 | 6:43 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी आणलेला एक अनोखा केक कापून अजित पवार यांनी आपला वाढदिवस साजरा केला. “मी अजित आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”, असे या केकवर लिहिले होते. अजितदादा यांना हा केक पाहून मनोमन आनंद झाला. मात्र, अजितदादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का? हा प्रश्न आहेच. कारण, महायुतीच्या तिन्ही पक्षांना आपल्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा असे वावत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय दिल्ली हायकमांड घेणार आहे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली.

विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने जास्त जागा जिंकल्या तर भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करेल असे भाजप नेत्याने स्पष्ट केले. तर, दुसरीकडे शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे शिवसेनेने कितीही जागा जिंकल्या तरी शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असे शिवसेनेने म्हटले आहे.

विधानसभेच्या 288 जागांपैकी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी ( अजितदादा) या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 100 जागांवर दावा सांगितला आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष प्रत्येकी 80-80 जागांवर तडजोड करतील. तर, भाजप 160 जागा लढविणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय नवी दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे असेही या भाजप नेत्याने सांगितले.

भाजप नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुक झाल्या. त्यावेळी भाजपने कोणत्याही नेत्याला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले नाही. हीच प्रक्रिया महाराष्ट्रात स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे. बराच विचारविनिमय केल्यानंतर महायुतीच्या एकाही नेत्याला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार नाही, असा निर्णय घेतला आहे असे या नेत्याने सांगितले.

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल. जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत पक्ष किमान 160 जागांवर दावा करणार आहे. चर्चेदरम्यान या संख्येवर आम्ही भर देऊ. भाजप 100 हून अधिक जागा जिंकेल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्रीपदावर दावा सांगू अशी माहितीही या नेत्याने दिली.

दरम्यान, मुख्यमंत्रिपद आणि जागांची संख्या या दोन्हीबाबत भाजपच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी पसरली आहे. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘मुख्यमंत्रीपदावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील.’, असे स्पष्ट केले.

Follow Us