
शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठं विधान केलं आहे. 2027 मध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने गोवा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आम्ही फक्त ही निवडणूक लढवणारच नाही तर मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, गोव्यामध्ये बाहेरचे लोक सत्ता गाजवायला लागले आहेत. गोव्याच्या लोकांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यावर अन्याय चालू आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. गजानन कीर्तिकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे.
नेमकं काय म्हणाले गजानन कीर्तिकर?
गोव्यामध्ये येत्या 2027 मध्ये निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठं विधान केलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन गोव्यात शिवसेना स्थापन झाली आहे. त्याला आता एक वर्ष झालं आहे. 2027 मध्ये शिवसेना पूर्ण ताकतीने गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे, इथे आम्ही मुख्यमंत्री देखील शिवसेनेचाच बनवणार आहोत, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. मात्र अजून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला नाही, येत्या काळात त्याबद्दल स्पष्ट होईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
गोव्यामध्ये बाहेरचे लोक सत्ता गाजवायला लागले आहेत. गोव्याच्या लोकांना नोकरी मिळत नाही, त्यांच्यावर अन्याय चालू आहे, असा आरोप देखील यावेळी गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. गजानन कीर्तिकरांचं हे विधान म्हणजे शिवसेना शिंदे गट गोवा विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत मानले जात आहेत? त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत गोव्यात शिवसेना शिंदे गटाला किती यश मिळणार? मुख्यमंत्री कोणाचा होणार? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान सध्या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. यावर देखील कीर्तिकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युद्धामुळे जगभरात मोठा तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे जगभरातील जे व्यापारी लोक आहेत, ते भाववाढ करत असल्याचं कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.