Raj Thackeray : …तर मनसेचे 4-5, 4-5 नगरसेवक सगळ्या पालिकेत दिसतील- प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar on Raj Thackeray : राज ठाकरेंनी येत्या काळात जर व्यवस्थित राजकीय पावलं टाकली, तर सगळ्या पालिकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार-पाच, चार-पाच नगरसेवक दिसतील, असं ते म्हणालेत.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) थेट मनसेच्या राजकीय भविष्याबाबत अंदाज वर्तवलाय. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray)भोंग्याच्या मुद्द्याचा (Loudspeaker Row) मनसेला फायदा होईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. राज ठाकरेंनी घेतलेली भोंग्याची भूमिका मनसेला राजकीय फायदा मिळवून देण्यात यशस्वी ठरेल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. भोंग्याच्या नाटकात फायदा कुणाचा झाला असेल, तर तो राज ठाकरेंचा, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. ते पत्रकारांशी बोलत होते. इतकंच काय तर मनसेही ही भाजपची बी टीम असल्याचा तर्कही लावला जात होता. त्यावरुनही त्यांनी निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या भोंग्याच्या मुद्द्यामुळे शिवसेनेला तर धक्का लागला आहेच. शिवाय भाजपलाही धक्का लागल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपला धक्का लागला नाही, असं जर भाजप म्हणत आहे, तर मग देवेंद्र फडणवीसांची सभा सायनमध्ये का घेण्यात आली, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय.
तर मनसेचे प्रत्येक पालिकेत नगरसेवक!
दरम्यान, राज ठाकरेंनी येत्या काळात जर व्यवस्थित राजकीय पावलं टाकली, तर सगळ्या पालिकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार-पाच, चार-पाच नगरसेवक दिसतील, असंही ते म्हणालेत. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांना तीव्र विरोध केला होता. त्यानंतर राज्यातील बहुतांश ठिकाणचे मशिदींवरील भोंगे तर खाली उतरलेच. शिवाय अनेक मंदिरावरील भोंगेही खाली उतरवण्यात आले.
म्हणून भाजपला धक्का?
भोंग्याचा मुद्दा ताणून धरण्यासोबत राज ठाकरेंनी आता अयोध्या दौऱ्याचाही बेत आखला आहे. मात्र भाजप खासदार बृजभूषण सिंहांनीच राज ठाकरेंच्या या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध मनसे असा वाद येत्या काळात यूपीत पाहायला मिळेल. त्याची सुरुवातही झालीच आहेच. उत्तर भारतीयांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांबाबत राज ठाकरेंनी माफी मागावी, अशी मागणी भाजप खासदारानं केली आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर त्यांनी अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आलाय.
उत्तर भारतीयांबाबत नेहमीत आक्रमकपणे भूमिका घेतलेल्या राज ठाकरेंची गेल्या काही काळातील उत्तर भारतीयांबाबतची मतं मवाळ झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र आता उत्तर भारतीयांची माफी राज ठाकरे मागणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.