काकींची इच्छा नसताना शपथ दिली असावी… त्या चार-पाच लोकांनी… रोहित पवार यांचा राष्ट्रवादीतील नेत्यांवर हल्लाबोल
Rohit Pawar And Sunetra Pawar : रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सुनेत्रा काकींची इच्छा नसताना शपथ दिली असावी अशी शक्यता वर्तवली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर काहीच दिवसांनी राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी साठी घाई केल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिली आहे. सर्वसामान्य जनतेनेही याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अशातच आज रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी शपथविधीवर शंका उपस्थित करत सुनेत्रा काकींची इच्छा नसताना शपथ दिली असावी असी शक्यता वर्तवली आहे. यावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
काकींची इच्छा नसतानाही…
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘त्या नेत्यांकडे सत्ता आहे. राज्यात, ती मेंटेन ठेवण्यासाठी, ती सत्ता तशीच राहावी म्हणून ती गोष्ट महत्त्वाची वाटली असेल. मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्या विषयाकडे त्यांचं लक्ष गेलं. काकींची इच्छा नसताना त्यांनी त्यांना शपथ दिली असावी. सर्वांच्या प्रायोरिटी वेगळ्या आहेत. आमच्या काकाचा अपघात झाला ही आमची प्रायोरिटी आहे. काकी, पार्थ आणि जयलाही ही महत्त्वाची आहे. नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांना माहीत आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ‘रोहित पवार काही गोष्टी मांडत असेल तर त्याला अफवा म्हणत नाही. ही रोखठोक म्हणतात. ज्यांना कुणाला काही वाटतं ते वाटू द्या. ते चारपाच लोक वेगळे आहेत. त्यांचा पक्ष वेगळा आहे. आमच्यासाठी काका महत्त्वाचे आहे. आमच्या काकाचा अपघात कसा झाला, याची उत्तरे आम्हाला माहीत पाहिजे.’
शरद पवारांच्या विधानावर भाष्य
अजित पवार यांनी 28 तारखेला अजित पवारांच्या अपघातावर बोलताना हा केवळ एक अपघात असल्याचे म्हटले होते. याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, शरद पवारांनी 28 तारखेला स्टेटमेंट दिलं. अपघाताला सहा तास झाले असतील. मी 13 दिवसाने बोलतो. सहा तासात काय माहिती मिळणार. दुसऱ्या दिवशी लाखो लोक येणार होते. त्यामुळे अर्धवट माहिती दिली तर लाखो लोक काहीही करू शकले असते. तेवढी प्रगल्भता पवार साहेबांकडे आहे. म्हणून मी 13 दिवसानंतर मी बोलत आहे. काल साहेबांशी बोलणार होतो. पण त्यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे चर्चा झाली नाही. मी सतत सांगत होतो. ते साहेबांना माहीत होतं. त्यामुळे साहेबांनी मला काही विचारलं नाही. मीही त्यांना माहिती दिली नाही. पण त्यांच्या मनात काय आहे हे मला कळतं.
