Sanjay Raut: भारतीय जनता पार्टीनं राज ठाकरेंचा बळी घेतला, राऊतांकडून पुन्हा एकदा ‘हिंदू’ कार्ड

आज अनेक मोठ्या मंदिरांमध्ये काकड आरतीही होऊ शकली नाही. हाच धागा पकडत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपनं आपल्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी घेतल्याचा टीका राऊत यांनी केलीय.

Sanjay Raut: भारतीय जनता पार्टीनं राज ठाकरेंचा बळी घेतला, राऊतांकडून पुन्हा एकदा हिंदू कार्ड
राज ठाकरे, संजय राऊत
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 4:17 PM

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भोंग्यांविरोधातील आक्रमक भूमिका आणि भाजपकडून हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरुन सुरु असलेली टीका यामुळे शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर आज बहुतांश मशिदींवर सकाळजी अजान झाली नसल्याचं कळतंय. तर ज्या मशिदींवर लाऊडस्पीकरवर अजान झाली त्यासमोर मनसैनिकांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे आज अनेक मोठ्या मंदिरांमध्ये काकड आरतीही होऊ शकली नाही. हाच धागा पकडत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार टीका केलीय. भाजपनं आपल्या राजकारणासाठी राज ठाकरेंचा बळी घेतल्याचा टीका राऊत यांनी केलीय.

‘भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदुंचाही गळा घोटला’

मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपनं महाराष्ट्रात हिंदुत्वाचा गळा घोटळाय. 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. भाजपनं मनसे सारख्या पक्षाला पुढे करुन हा विषय चर्चेत आणला. गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. आज सकाळपासून मी पाहतोय जो अहवाल आला आहे गुप्तचर खात्याचा किंवा इतर खात्याचा. महाराष्ट्रातील प्रमुख श्रद्धास्थानं जी आहेत. त्यात प्रमुख शिर्डी, त्र्यंबकेश्वर अशा अनेक ठिकाणी सकाळच्या काकड आरत्या होतात. मंदिरात त्यावेळी खूप कमी लोकांना प्रवेश असतो. मात्र, या काकड आरतीसाठी हजारो लोक वाट पाहत असतात. आज भोंग्यांच्या विषयामुळे या संपूर्ण देवस्थानावर लाऊडस्पीकर लागले नाहीत आणि लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाली. त्यांना काकड आरतीचा आनंद घेता आला नाही. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करुन भाजपने आणि त्यांच्या उपवस्त्राने हिंदुंचाही गळा घोटला हे स्पष्ट झालं, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय.

‘हिंदूंसाठी आणि श्रद्धाळूंसाठी हा काळा दिवस’

आज सकाळपासून आमच्याकडे हजारो लोकांनी तक्रारी केल्यात की आमच्यावर अन्याय का? शिर्डीतही काकड आरतीसाठी उपस्थित हजारो लोकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक गावात काकड आरतीचा आनंद हजारो लोक घेत असतात तो आज घेता आला नाही. हिंदूंसाठी आणि श्रद्धाळूंसाठी हा काळा दिवस आहे, असंही राऊत म्हणाले. हे आंदोलन ज्यांनी सुरु केलंय त्या विरोधात आता हिंदूंमध्ये जागृती होतेय. आता हिंदूच रस्त्यावर उतरले तर मला आश्चर्य वाटणार नाही. मात्र, आम्ही आवाहन करतोय की हिंदुंनी संयम राखावा, असं आवाहनही संजय राऊत यांनी केलंय.

‘भाजपकडून राजकारणासाठी राज ठाकरेंचा वापर’

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचं काय करायचं त्यासाठी कायदा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे, त्यानुसारच कारवाई होईल. त्याबाबतचा निर्णय प्रायव्हेट व्यक्ती घेऊ शकत नाही. हा वाद धार्मिकच आहे. हा हिंदूंमध्ये फुट पाडण्याचा वाद आहे. यामागे भाजपचं कारस्थान आहे. भाजपने राज ठाकरे यांचा बळी दिलाय. जी गोष्ट भाजपला जमत नाही ते ती गोष्टी छोट्या पक्षांकडून करुन घेतात. आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं की भाजपनं राज ठाकरेंचा वापर त्यांच्या राजकारणासाठी केला, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.