Sanjay Raut Arrest : संजय राऊत प्रकरणी ईडीची मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी, राऊतांच्या अडचणी वाढणार?

| Updated on: Aug 02, 2022 | 1:02 PM

Sanjay Raut Arrest : राऊत यांना अटक केल्यानंतर राऊत यांच्याशी संबंधितांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. या लोकांची पुन्हा चौकशी करून महत्त्वाची माहिती घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राऊतांची आणखी अडचण वाढू शकते.

Sanjay Raut Arrest : संजय राऊत प्रकरणी ईडीची मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी, राऊतांच्या अडचणी वाढणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक केल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणांमध्ये राऊत यांना अटक करण्यात आलेली आहे. ते सध्या ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत. त्यांची आजही ईडीकडून (ED) कसून चौकशी सुरू आहे. एकीकडे राऊतांची कोठडीत चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे राऊतांशी संबंधित दोन ठिकाणी ईडीच्या दोन पथकांनी धाडी मारल्या आहेत. ईडीने नेमक्या धाडी कुठे मारल्या याची माहिती मिळाली नाही. मात्र, राऊतांशी संबंधित दोन ठिकाणी ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू असून या सर्च ऑपरेशनमधून बरीच माहिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे ईडीच्या या आजच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ईडीने आधी संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर छापे मारले होते. त्यानंतर त्याच दिवशी ईडीने दादरच्या गार्डन कोर्ट इमारतीतील राऊत यांच्या घरावर छापे मारले. तसेच गोरेगाव येथेही ईडीने छापे मारून सर्च ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर 16 तासांच्या चौकशीनंतर राऊत यांना अटक करण्यात आली होती. काल त्यांना ईडीच्या कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांनी तीन दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. या कोठडीनंतर राऊत यांची आज पुन्हा चौकशी सुरू झाली आहे. एकीकडे राऊतांची चौकशी सुरू असतानाच आज राऊत यांच्या संबंधित मुंबईतील तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

संबंधितांना समन्स

दरम्यान, राऊत यांना अटक केल्यानंतर राऊत यांच्याशी संबंधितांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. या लोकांची पुन्हा चौकशी करून महत्त्वाची माहिती घेतली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राऊतांची आणखी अडचण वाढू शकते. दरम्यान, स्वप्ना पाटकर या पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार असून त्यांनाही चौकशीला बोलावलं जाऊ शकतं, असं सांगितलं जात आहे.

उद्धव ठाकरेंचा इशारा

दरम्यान, राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला होता. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांच्या अटकेवरून भाजपला इशारे दिले होते. दिवस सदा सर्वदा कायम राहत नसतात. आज तुमचे दिवस आहेत. उद्या इतरांचे येतील तेव्हा काय कराल? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला होता.