भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच, वादग्रस्त नेत्यांवर सामनातून हल्ला
आजच्या सामना अग्रलेखातून भाजपच्या वादग्रस्त नेत्यांचा समाचार घेताना राऊतांनी नको नको ती विशेषणं वापरलीत. बाटगे, झुरळ, कुत्री, बेवडे... काय काय सांगावं.....!
मुंबई : पाठीमागील काही महिन्यापासून भाजपचे नेते शिवसेनेशी पंगा घेत आहेत. त्याला कारणंही तसंच आहे…. दृष्टीक्षेपात असलेली मुंबई महापालिका निवडणूक… भाजपचे एकापाठोपाठ एक नेते शिवसेनेवर हल्ला चढवून चर्चेत येतात… पडळकर, राणे आणि आता प्रसाद लाड… ज्या त्या वेळी शिवसेना नेते टीकेला उत्तर देत असतात. पण शिवसेनेची अस्मिता असणाऱ्या सेना भवनावर हल्ला करण्याची भाषा प्रसाद लाड यांनी केली. मग मुख्यमंत्र्यांपासून राऊतांपर्यंत सगळेच जण खवळले आहेत. आजच्या सामना अग्रलेखातून भाजपच्या वादग्रस्त नेत्यांचा समाचार घेताना संजय राऊतांनी नको नको ती विशेषणं वापरलीत. बाटगे, झुरळ, कुत्री, बेवडे… काय काय सांगावं….. सरतेशेवटी भाजपच्या बाटग्यांचं महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.
बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच
भारतीय जनता पक्षातील बाटग्यांचे महामंडळ म्हणजे शिवसेनेवर सोडलेले भाडोत्री कुत्तरडेच! कशात काही नसताना झुरळांच्या तांड्यांसारखे आपापल्या खुराड्याच्या गच्चीवर येऊन नरडी फुगवून प्रवचने झोडणारे हे पोंगा पंडित!
भाजपला जन्माचे डोहाळे लागण्याआधी शिवसेनाकडून वाघाच्या काळजाचं राजकारण
आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे. मराठी माणसांच्या न्याय्य, आशा-आकांक्षांचा आवाज म्हणजे शिवसेना! शिवसेनेच्या विध्वंसाची जी भाषा आजचे पावटी पावन भाजपवाले (बाटगे) बडबडत आहेत ते त्यांचे पोटाचे जुने दुखणे आहे.
कालपर्यंत दुसऱ्याच्या बॅगा उचलून गुजराण, आज पोटापाण्यासाठी जोडे उचलण्याचं काम
कालपर्यंत कुणा दुसऱ्यांच्या बॅगा उचलून गुजराण करीत होते. आज पोटापाण्यासाठी आणखी कुणाचे तरी जोडे उचलत आहेत! असे बाटगे हेच महाराष्ट्र व मराठी माणसांसाठी काळ ठरत आले, पण पुढे काळाच्या ओघात हे बाटगे वरळीच्या गटारातून वाहून कायमचे नामशेष झाले.
स्वत:च्या पायावर याल आणि जाताना खांद्यावर जाल, त्यासाठी खांदेकरी घेऊन या
बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर! पण एक लक्षात ठेवा, शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित ‘खांद्यावर’च जाण्याची वेळ येईल. त्यासाठी येताना ‘खांदेकरी’ही घेऊन या.
धंदेवाईक दलालांच्या थैल्या हे शिवसेनेचे बळ कधीच नव्हते, राणेंना उत्तर
शिवसेना भवन हे आता सेनाभवन राहिलं नाही, तर कलेक्शन भवन झालंय, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला सामना अग्रलेखातून उत्तर देण्यात आलंय. धंदेवाईक दलालांच्या थैल्या हे शिवसेना भवनाचं बळ कधीच नव्हतं तर तप्त मनाच्या शिवसैनिकांची मनगटे हेच शिवसेनेचे बळ राहिले आहे, असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं आहे.
तप्त मनाच्या शिवसैनिकांची मनगटे हेच शिवसेनेचे बळ
शिवसेना अनेक अग्निदिव्यांतून पावन होऊन पुढे गेली आहे. धंदेवाईक दलालांच्या थैल्या हे शिवसेनेचे बळ कधीच नव्हते. तर तप्त मनाच्या शिवसैनिकांची मनगटे हेच शिवसेनेचे बळ राहिले. शिवसेना ही ज्वलंत मराठी मनाची संघटना म्हणून कायम स्वबळावरच जगत आहे. आरामखुर्चीवाले तत्त्वज्ञान आणि बाटग्यांच्या गोतावळ्यातले मखरबंद राजकारण शिवसेनेने कधीच केले नाही. सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत.
(Sanjay Raut reply BJP Controvercial Leaders Who Criticized Shivsena Through Saamana Editorial)
हे ही वाचा :
प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, संजय राऊतांनी 3 शब्दात इज्जत काढली
तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील, शिवसेना खवळली