महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्था नीट चालू नये, ही दिल्लीतील काही लोकांची इच्छा: जयंत पाटील

| Updated on: Apr 08, 2021 | 3:17 PM

कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली | Jayant Patil Covid vaccination

महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्था नीट चालू नये, ही दिल्लीतील काही लोकांची इच्छा: जयंत पाटील
Jayant patil
Follow us on

मुंबई: देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी (Covid vaccine) महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये, अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. (NCP leader Jayant Patil take a dig at Modi govt over Covid vaccine distrubution)

स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात भाष्य केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.

कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राला 85 लाख लसी मिळाल्या आहेत मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12.30 कोटी तर अक्टिव्ह रुग्णसंख्या जवळपास 4.73 लाख इतकी आहे. गुजरातला 80 लाख लसी मिळाल्या तिथे लोकसंख्या 6.50 कोटी आहे तर अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 17 हजार आहे याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली.

‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांची चेष्टा केली’

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन जी हे सोयीस्करपणे विसरले की, महाराष्ट्र लसीकरणाच्या बाबतीत देशात अग्रेसर आहे व त्यास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व त्यांच्या संपूर्ण टीमचे योगदान आहे. तपासणी, ट्रेसिंग, विलगीकरण व लसीकरण या बाबतीत राज्य कृतीशील आहे. दर आठवड्याला 40 लाख लसी देण्याच्या निवदेनाला केंद्रीय आरोग्य मंत्री सकारात्मक प्रतिसाद देतील अशी आमची अपेक्षा होती. परंतु त्यांनी एक राजकीय भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व चांगल्या कामगिरीची चेष्टा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे राज्याला सापत्न भावनेने वागणूक देण्याकडे केंद्र सरकारचा कल आहे. खालच्या दर्जाच्या राजकीय खेळी करून मूळ मुद्द्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यात भाजपाचा हातखंडा आहे. राज्याच्या वाट्याला किती लसी आल्या व त्यातील किती लसी नागरिकांना दिल्या गेल्या याचा संपूर्ण लेखाजोखा हर्ष वर्धन यांच्या माहितीसाठी उपलब्ध आहे. तो त्यांनी निश्चितच तपासावा, असेही महेश तपासे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

कोरोना लसीचा तुटवडा संपवण्यासाठी रोहित पवारांचा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…

(NCP leader Jayant Patil take a dig at Modi govt over Covid vaccine distrubution)