एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु, विजय वडेट्टीवारांचं आश्वासन

| Updated on: Nov 11, 2021 | 4:21 PM

मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत रात्र काढली. निर्णय होत नाही तोवर मुंबई सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु, विजय वडेट्टीवारांचं आश्वासन
विजय वडेट्टीवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री
Follow us on

नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या आंदोलनावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईतील आझाद मैदानात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत रात्र काढली. निर्णय होत नाही तोवर मुंबई सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी दिलाय. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, यावर सन्मानपूर्वक तोडगा काढला जाईल, असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलंय. (Vijay Vadettiwar’s appeal to ST workers to call off strike)

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कमी आहे. पगार वाढवण्याची आवश्यकता आहे. न्यायालयाच्या माध्यमातून संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा. प्रवाशांना वेठीस धरणं योग्य नाही. हा संप मिटवण्यासाठी मधला मार्ग काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु आहेत. विरोधी पक्षातील नेते एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देत आहेत. विरोध पक्ष प्रवाशांना वेठीस धरत आहेत. काही राजकीय पक्ष संप चिघळवू पाहत आहेत. भाजप सत्तेत होता तेव्हा एसटीचं विलिनीकरण होत नाही असं सांगत होते. आताच तेच भाजप नेते एसटीच्या विलिनीकरणाची मागणी करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केलीय.

मागच्या अर्थमंत्र्यांनी शब्द फिरवला, वडेट्टीवारांचा आरोप

आंदोलन मागे घ्यावं ही विनंती आहे. संपावर सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचे प्रयत्न आहेत. मागच्या सरकारमध्ये अर्थमंत्र्यांनी शब्द फिरवला. त्यांचा व्हिडीओ पूर्ण आहे, अर्धा नाही. संपाबाबत चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची तयारी आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले.

अनिल परब यांची भाजपवर जोरदार टीका

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. आम्हाला काही एसटी बंद ठेवण्यात किंवा खाजगी बसेसना स्टँडवर आणण्यात रस नाही. एसटी कामगार राजकारणाचे बळी ठरत आहेत. आज त्यांची भाषा पाहिली तर संप चिघळवण्याचे काम ते करत आहेत, असं सांगतानाच त्यांच्या काळात एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल परब यांनी केला. त्यावेळी राज्याची आणि एसटीची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. एसटी व्यवस्थित धावत होती. आज जे मागणीसाठी जोरजोरात बोलत होते त्यांचं तर सरकार तेव्हा होतं. केंद्रातही त्यांचंच सरकार होतं. तेव्हा त्यांनी एसटीचं विलनीकरण का केलं नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच आज थातूरमातूर उत्तर देणाऱ्यांनी पूर्ण व्हिडीओ दाखवावाच, असं आव्हानच त्यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना दिलं.

इतर बातम्या :

‘अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचे कौतुक करतात’, अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’

Minister Vijay Vadettiwar’s appeal to ST workers to call off strike