‘अजित पवारांना पिळून काढलं, त्यांचा रस निघाला’, ठाकरे गटाच्या नेत्याचे जिव्हारी लागणारे शब्द

"ज्याचं संपूर्ण आयुष्य आमच्यापक्षात असताना हफ्तेबाजीवर पोसलं गेलं इथून थैल्या गोळा करुन दिल्लीच्या चरणी वहायच्या आणि आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं. अशा व्यक्तीबद्दल काय बोलायचं? 50-100 कोटी कुठून आणले?" असा सवाल या शिवसेना नेत्याने विचारला.

अजित पवारांना पिळून काढलं, त्यांचा रस निघाला, ठाकरे गटाच्या नेत्याचे जिव्हारी लागणारे शब्द
ajit pawar
| Updated on: Aug 16, 2024 | 10:18 AM

“उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र असं राज्य आहे, ज्या महाराष्ट्राने नरेंद्र मोदी, अमित शाह, आणि देवेद फडणवीस यांचा पराभव केला. आता आम्ही विधानसभेच्या तयारीला लागलो आहोत. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढू. मविआच्या संयुक्त मेळाव्याला मुंबईत आज तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. आजच्या मेळाव्याच यजमानपद शिवसेनेकडे आहे. बरोबर 11 वाजता उद्धव ठाकरे उद्घाटनपर भाषणाने सुरुवात करतील, त्यानंतर इतर सगळे प्रमुख नेते बोलतील” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “तिन्ही पक्षात एक वाक्यता आहे. जागा वाटपाबाबत मतभेद नाहीत. आम्ही तिघांनी ठरवलेले आहे, कोणत्याही परिस्थितीत नोव्हेंबरमध्ये मविआ सरकारला सत्तेवर बसवायचं आहे. शिवसेना पक्ष प्रमुख दिल्लीत होते. त्यांच्या दिल्ली दौऱ्यात अनेक बैठका झाल्या. शरद पवार, राहुलजी, खर्गे, सोनियाजी यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत एकच मुख्य मुद्दा होता, एकत्र लढायचं. एकत्र काम करायचं. महाराष्ट्रातून दरोडेखोरांच्या सरकारला हटवायचं” असं संजय राऊत म्हणाले.

“आज आम्ही रणशिंग फुंकतोय. आज सुरुवात होईल. त्यानंतर पुढचे तीन महिने निवडणुका होईपर्यंत महाराष्ट्रात प्रचाराच एकत्र सूत्र पुढे नेऊ. लाडक्या बहिणींचा नाही तर जनतेच्या पैशातून निवडणुकीचा प्रचार सुरु आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “ज्याचं संपूर्ण आयुष्य आमच्यापक्षात असताना हफ्तेबाजीवर पोसलं गेलं इथून थैल्या गोळा करुन दिल्लीच्या चरणी वहायच्या आणि आपलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं. अशा व्यक्तीबद्दल काय बोलायचं? 50-100 कोटी कुठून आणले? त्याच पैशांनी आमदार, खासदार, नगरसेवक, न्याय विकत घेतात. हे कष्टाच्या पैशावर होत नाही, अशा व्यक्तीबद्दल न बोललेलं बरं जनता बोलेल” अशा शब्दात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली.

‘अजित पवार घरातल्या घरातच कुस्ती करणार’

“बारामतीकरांनी लोकसभेला अजित पवारांना पिळून काढलं. त्यांचा रस निघाला. आता पुतण्याविरुद्ध कर्जत-जामखेडमध्ये लढू शकतात. अजित पवार घरातच लढणार. कधी बहिणी विरुद्ध कधी पुतण्याविरुद्ध. ते घरातच लढणार. घरातल्या घरातच कुस्ती करणार” अशा शब्दात अजित पवारांवर टीका केली.