अखेर उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं! विमान प्रवासादरम्यान फडणवीसांसोबत…

शुक्रवारी मुंबईवरून नागपूरला जाताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानाने प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांच्यात चर्चा झाल्याचे समोर आले आहे.

अखेर उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं! विमान प्रवासादरम्यान फडणवीसांसोबत...
devendra fadnavis and Uddhav Thackeray
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 28, 2026 | 11:30 AM

सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर आता ठाकरेंनी त्या बंडखोर खासदारांच्या मतदार संघाचा दौरा सुरु केला आहे. ते प्रत्येक मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, शुक्रवारी मुंबईहून नागपूर जात असताना उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच विमानात होते. त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात होते. आता उद्धव ठाकरे यांनी स्वत: उत्तर दिले आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आज उद्धव ठाकरे हे परभणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, नेमकी काय चर्चा झाली ही येत्या काळात कळेल असे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर येत्या काळात राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप येणार असल्याचे म्हटले जात आहे.

“परभणीकरांना धन्यवाद द्यायचे आहेत”

या सभा नाहीये, कार्यकर्त्यांना भेटायला आलोय. परभणीकरांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी शिवसेनेला महापौर दिला आहे. कालपासून कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. कार्यकर्त्यांची आणि लोकसभेला ज्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना विजयी केलं. त्यांची माफी मागायला आलोय. एका गोष्टीचा अभिमान आहे, काही गोष्टींना विचित्र पार्श्वभूमी असते. परभणी हिंगोलीत एक आहे, इथून निवडून गेलेले असतात त्यांना परत निवडून दिलं जात नाही. कालांतराने ते गद्दारी करतात. पण मतदार शिवसैनिक कायम शिवसेनेसोबत राहिले आहेत. ते आताही सोबत राहतील.

एकनाथ शिंदे या प्रवासाबाबत काय म्हणाले?

‘जनतेनं त्यांना एकाच विमानातून प्रवास करायचं तिकीट दिलं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून प्रवास सुरू केला. आता ते गटांगळ्या खात सुटले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अशा प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत. आणि त्यांनी 2019 ला कपटी मित्र किती घातक असू शकतो? हे पाहायलं आहे,’ असं या विमान प्रवासावर बोलताना शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us