Video : अमरावतीत जिल्हा नियोजन समिती बैठकीत राडा, यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी!

| Updated on: Oct 18, 2021 | 5:46 PM

जिल्हा नियोजन समितीतील रवी राणा यांची आक्रमकता पाहून यशोमती ठाकूर यांनी पोलिस आयुक्तांना बोलवावं असं फर्मानच सोडलं. मात्र, रवी राणा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपण केवळ नौटंकी करत आहात, असा आरोप ठाकूर यांनी रवी राणांवर केला. त्यानंतर संतापलेले रवी राणा हे सभागृह सोडून बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Video : अमरावतीत जिल्हा नियोजन समिती बैठकीत राडा, यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी!
रवी राणा, यशोमती ठाकूर
Follow us on

अमरावती : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या मुद्द्यावरुन चांगलाच राडा घातलाय. जिल्हा नियोजन बैठक सुरु होताच रवी राणा यांनी अमरावतीतील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत टाकावी, अशी मागणी करणारा ठराव पारित करावा अशी आग्रही मागणी केली. त्यावरुन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. (Dispute between MLA Ravi Rana and Guardian Minister Yashomati Thakur in Amravati )

जिल्हा नियोजन समितीतील रवी राणा यांची आक्रमकता पाहून यशोमती ठाकूर यांनी पोलिस आयुक्तांना बोलवावं असं फर्मानच सोडलं. मात्र, रवी राणा काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपण केवळ नौटंकी करत आहात, असा आरोप ठाकूर यांनी रवी राणांवर केला. त्यानंतर संतापलेले रवी राणा हे सभागृह सोडून बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.

जिल्हा नियोजन समिती बैठकीपूर्वी सोयाबीनची होळी

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वीही रवी राणा यांनी जोरदार गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर त्यांनी सोयाबीनची होळी केली. सोयाबीनचं कुजलेलं पीक आणि संत्री फेकून त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. त्यावेळी राणा समर्थकांनी नियोजन भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. तसंच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचा ठराव मंजूर करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पाठवण्याची मागणीही त्यांनी केलीय.

सरकारकडून मदतीची घोषणा

महापूर, अतिवृष्टीमुळे, चक्रीवादळामुळे राज्यात यंदा शेती आणि शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. अशावेळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी केली जात होती. मात्र, मदतीसाठी विलंब होत असल्यानं सर्व स्तरातून संताप व्यक्त होत होता. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं 13 ऑक्टोबर रोजी शेती पिकाच्या झालेल्या नुकसानापोटी 10 हजार कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे 55 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाची वाट न पाहता 10 ङजार कोटीचं अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं.

राज्य सरकारची मदत कशी?

जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर

दरम्यान, राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत 2 हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

इतर बातम्या :

‘सरकारनं हे एक तरी पारदर्शक काम करावं’, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावरुन बच्चू कडूंचा घरचा आहेर

डिसेंबरमध्ये मुंबईत राजकीय भूकंप? भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार, यशवंत जाधवांचा दावा

Dispute between MLA Ravi Rana and Guardian Minister Yashomati Thakur in Amravati