पंकजांना धक्का देण्याच्या नादात बीडमध्ये शिवसंग्रामच फुटणार?

सचिन पाटील

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

बीड : मंत्रीपद न दिल्यामुळे शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नाराजी अजूनही कायम आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय. कारण, त्यांनी सरकार आणि बीड जिल्हा परिषदेतून बाहेर पडण्यासाठी 25 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिलाय. शिवसंग्रामच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे स्पष्ट नसलं तरी 25 तारखेला विनायक मेटे त्यांच्या पक्षाचा सरकारसोबत रहायचं की नाही याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत. […]

पंकजांना धक्का देण्याच्या नादात बीडमध्ये शिवसंग्रामच फुटणार?

बीड : मंत्रीपद न दिल्यामुळे शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नाराजी अजूनही कायम आहे हे पुन्हा एकदा समोर आलंय. कारण, त्यांनी सरकार आणि बीड जिल्हा परिषदेतून बाहेर पडण्यासाठी 25 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिलाय. शिवसंग्रामच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे स्पष्ट नसलं तरी 25 तारखेला विनायक मेटे त्यांच्या पक्षाचा सरकारसोबत रहायचं की नाही याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांचं कौतुक आहे , मात्र राजकीय कामात ते मित्रपक्षावर अन्याय करत असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला. साडेचार वर्षांपासून भाजपसोबत राहूनही कसलाच विचार केला नसल्याने मेटे हे भाजपवर नाराज झाले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसंग्रामच्यावतीने उमेदवार उभे करण्यात येणार असून बीड लोकसभा आणि परळी विधानसभेसाठीही उमेदवार उभे करण्यासाठी शिवसंग्राम प्रयत्नशील राहणार असल्याचं मेटे यांनी काल बीडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं.

विनायक मेटे हे सध्या विधानपरिषदेचे आमदार असून भाजपच्या पाठिंब्यावर ते निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी सरकारचा पाठिंबा काढला तरी राज्यातल्या राजकारणात काहीही बदल होणार नाही. मात्र बीड झेडपीमध्ये भाजपने शिवसंग्रामचा पाठिंबा घेतलेला आहे. त्यामुळे इथे अटीतटीची लढत होऊ शकते असं बोललं जातंय. पण दुसरीकडे शिवसंग्राम पक्ष बीड झेडपीतून बाहेर पडला तरी पक्षाचे काही सदस्य मात्र सत्तेतच राहण्याची शक्यता आहे.

शिवसंग्रामचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी बीड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत. राजेंद्र मस्के यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. या वाढलेल्या संबंधांमुळेच काही दिवसांपूर्वी राजेंद्र मस्के यांचं युवा प्रदेशाध्यक्षपदही काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे शिवसंग्रामने पाठिंबा काढला तरी एक सदस्य भाजपला पाठिंबा देणार असल्याचंही बोललं जातंय. शिवसंग्रामचे दुसरे सदस्य विजयकांत मुंडे हे पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे शिवसंग्रामच्या बाहेर जाण्याने भाजपच्या सत्तेला धोका नसल्याचं चित्र आहे.

बीड जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल

बीड झेडपीमध्ये एकूण सदस्यसंख्या 60 आहे. भाजप 20, राष्ट्रवादी 26, काँग्रेस 3, काकू नाना आघाडी 3, शिवसंग्राम 4 आणि शिवसेना 4 असं पक्षीय बलाबल आहे. बीड झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला शिवसेना, शिवसंग्राम, काँग्रेसचा एक आणि सुरेश धस गटाच्या पाच जणांनी पाठिंबा दिला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 34 विरुद्ध 25 असं मतदान झालं होतं.

दरम्यान, बीड जिल्हा परिषदेतील सहा सदस्यांचा सध्या मतदानाचा अधिकार गोठवलेला आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात प्रलंबित आहे. मध्येच अचानक बहुमत सिद्ध करण्याची परिस्थिती उद्भवली तरीही भाजपला धोका नसल्याचं जाणकारांचं मत आहे. कारण, अशा परिस्थितीमध्ये एकूण सदस्यसंख्या ही 54 होईल. म्हणजेच बहुमतासाठी 28 मतांची आवश्यकता असेल. भाजपकडे स्वतःचे 20 सदस्य आहेत. शिवसेनेचे चार, काँग्रेस एक हा स्पष्ट पाठिंबा आहे. शिवाय शिवसंग्राममधील दोघांचा पाठिंबा मिळेल, असंही बोललं जातंय. शिवाय काँग्रेसचे उर्वरित दोन सदस्य आहेत, त्यांचा पाठिंबा मिळवणंही भाजपसाठी कठीण काम नसल्याचं जाणकार सांगतात.

शिवसंग्रामकडे पर्याय काय?

शिवसंग्रामने झेडपीतील भाजपची सत्ता उलथून टाकायची ठरवलं तरीही ते शक्य दिसत नाही. कारण, विरोधात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे. एकीकडे विनायक मेटे हे मुख्यमंत्री फडणवीस आपले मित्र असल्याचं सांगतात. त्यामुळे राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांचे मित्र असलेल्या विनायक मेटेंना जवळ घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्थानिक राजकीय विश्लेषक सांगतात.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI