महाराष्ट्रातील सात शिक्षणसंस्था J&K मध्ये कॉलेज सुरु करणार
कलम 370 मध्ये बदल करत जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर तेथे बदलाचे वारे वाहू लागले आहे. काश्मिरी तरुणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील शैक्षणिक संस्था आता पुढे सरसावल्या आहेत.
पुणे : कलम 370 मध्ये बदल करत जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतर तेथे बदलाचे वारे वाहू लागले आहे. काश्मिरी तरुणांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील शैक्षणिक संस्था आता पुढे सरसावल्या आहेत. महाराष्ट्रातील 7 प्रसिद्ध शैक्षणिक संस्था लवकरच काश्मीरमध्ये कॉलेज सुरू करणार असून त्यादृष्टीकोनातून प्रयन्त सुरू झाले आहेत.
फर्ग्युसन आणि व्हीआयटी शैक्षणिक संस्थांसह राज्यातील 7 शैक्षणिक संस्थांनी पुढाकर घेतला आहे. ते लवकरच काश्मीरमध्ये कॉलेज सुरु करणार आहेत. काश्मीरमधील विद्यार्थ्यांपर्यंत जागतिक दर्जाचे शिक्षण पोहोचण्यासाठी आपण हे प्रयत्न करत असल्याची भूमिका संबंधित संस्थांनी मांडली आहे.
सरहद संस्था यासाठी 2004 पासून प्रयत्न करत आहेत. मुफ्ती मोहम्मद सईद सरकारकडे देखील महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी कॉलेज सुरु करण्यासाठी जमीन मागितली होती. मात्र, त्यावेळी जमीन मिळाली नाही. यावेळी सरहद संस्थेच्या माध्यमातून राज्यातील 25 शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे, असं मत सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी व्यक्त केलं.
कोणत्या संस्थांचा समावेश?
जम्मू काश्मीरमध्ये महाविद्यालये सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांमध्ये फर्ग्युसन कॉलेज, व्हीआयटी, डी वाय पाटील विद्यापीठ, गरवारे कॉलेज, एस. पी. कॉलेज, अरहम आणि इतर संस्थांचा समावेश आहे.
काश्मीर आणि केंद्र सरकारच्या पातळीवर यासंदर्भात हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीकोनातून सकारात्मक पाऊलं उचलली जात आहेत. या निर्णयामुळे नैसर्गिक नंदनवन अशी ओळख असणारे काश्मीर शिक्षणाचे माहेरघर होण्यास वेळ नाही लागणार, असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.