मंदिरात दर्शन घेतल्यानंतर प्रसाद घरी घेऊन जाताय? भारतातील ‘या’ 5 मंदिरांमध्ये यावर सक्त मनाई
अनेक वर्षातून एकदा तरी देवदर्शनासाठी जातात. देवदर्शनासाठी गेल्यानंतर प्रसाद घेऊन येतात आणि तो प्रसाद नातेवाईकांमध्ये वाटतात. पण भारतात काही अशी मंदिरं आहेत, जेथे प्रसाद घरी घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे...तर कोणते आहे ते मंदिर जाणून घ्या...

हिंदू धर्मात देव आणि पूजापाठ करण्यास फार महत्त्व आहे. एवढंच नाही तर, अनेक जण आपल्या ज्या देवावर भक्त आणि श्रद्धा आहे, त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी लांब देवदर्शनासाठी देखील जातात. भारतात अनेक ठिकाणी प्राचीन मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराचा त्याचा खास इतिहास आहे.सांगायचं झालं तर, मंदिरं फक्त श्रद्धेची केंद्रे नसून, ती त्यांच्या अद्वितीय परंपरा, गूढ श्रद्धा आणि प्राचीन चालीरीतींसाठीही प्रसिद्ध आहेत. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भक्त आपल्या कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी प्रसाद घरी घेऊन जातात. प्रसाद हा देवाचा आशीर्वाद मानला जातो. पण, भारतात अशी काही मंदिरं आहेत जिथे प्रसाद घरी घेऊन जाणं योग्य मानलं जात नाही. भारतीत अशी कोणती मंदिरं आहेत, ते जाणून घ्या…
कामाख्या मंदिर: गुवाहाटी येथील नीलाचल पर्वतावर वसलेलं कामाख्या मंदिर, हे भारतातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर आपल्या अद्वितीय धार्मिक परंपरांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. स्थानिक मान्यतेनुसार, काही विशिष्ट वस्तू मंदिराच्या आवाराबाहेर नेणं योग्य मानलं जात नाही. प्रसाद देखील मंदिराच्या आवारात खावा लागतो.
कालभैरव मंदिर: मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेले कालभैरव मंदिर, भगवान शिवच्या उग्र रूपाला समर्पित आहे. हे मंदिर एका अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. येथे भक्त भगवान कालभैरवाला मद्य अर्पण करतात. स्थानिक मान्यतेनुसार, मंदिरात अर्पण केले जाणारे मद्य आणि इतर विशेष नैवेद्य केवळ देवासाठीच असतात. त्यामुळे, ते घरी घेऊन जाणं किंवा सामान्य नैवेद्यांप्रमाणे वाटणं योग्य मानलं जात नाही.
मेहंदीपूर बालाजी मंदिर: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात असलेले मेहंदीपूर बालाजी मंदिर हे देशातील सर्वात रहस्यमय मंदिरांपैकी एक मानलं जातं. हे मंदिर भगवान हनुमानाच्या बालाजी रूपाला समर्पित आहे. नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी देशभरातून भाविक येथे येतात. या मंदिराची सर्वात विशेष परंपरा अशी आहे की, येथे अर्पण केलेला प्रसाद किंवा कोणताही खाद्यपदार्थ घरी नेण्यास मनाई आहे.
कोटिलिंगेश्वर मंदिर: कर्नाटकातील कोटिलिंगेश्वर मंदिर हे लाखो शिवलिंगांसाठी प्रसिद्ध आहे. हे देशातील सर्वात अद्वितीय धार्मिक स्थळांपैकी एक मानलं जातं. मान्यतेनुसार, भगवान शिवाचे परम भक्त असलेल्या चंडेश्वराला विशेष महत्त्व आहे. देवाला अर्पण केलेल्या प्रसादावर चंडेश्वराचा प्रतिकात्मक अधिकार आहे. त्यामुळे, अनेक भक्त तो प्रसाद घरी नेणं टाळतात.. असं देखील म्हटलं जातं.
महूडी जैन मंदिर: महूडीमध्ये प्रसाद म्हणून सुखडी दिली जाते. ती अत्यंत पवित्र मानली जाते. सुखडी मंदिराच्या आतच खावी लागते. प्रसाद मंदिराबाहेर नेण्यास मनाई आहे. अशी श्रद्धा आहे की, सुखडी मंदिराबाहेर नेल्यास ते अशुभ मानले जाते. त्यामुळे, प्रत्येक भक्त तिथेच बसून प्रसाद पूर्ण करतो.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.
