रामरक्षा स्त्रोत्र लिहिले कोणी? वाचावे कधी? काय आहे महत्त्व? एका क्लिकवर घ्या जाणून

Ramraksha Strotra: अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील चोरीने रामभक्त संतापले आहेत. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा मुद्दा उचलत रामरक्षा आंदोलन सुरू केल आहे. त्यावरून राजकारण तापलेले आहे. रामरक्षा स्त्रोत्र कोणी लिहिले हे तुम्हाला माहिती आहे का?

रामरक्षा स्त्रोत्र लिहिले कोणी? वाचावे कधी? काय आहे महत्त्व? एका क्लिकवर घ्या जाणून
रामरक्षा स्त्रोत्र लिहिले कोणी?
| Updated on: Jul 17, 2026 | 3:26 PM

Ramraksha Strotra Budhkaushika Rushi: अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेट्टीवर डल्ला मारण्यात आला. कोट्यवधी रुपये, दागदागिन्यांची चोरी झाली. रामभक्त या प्रकारामुळे दुखावले गेले आहेत. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन सुरू आहे. मुंबईनंतर नागपूर आणि राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पण रामरक्षा स्त्रोत्र कोणी रचले हे तुम्हाला माहिती आहे का? ते कधी वाचावे याविषयीचे काही नियम आहेत का? त्याचे धार्मिक महत्त्व काय?

रामरक्षा स्त्रोत्राचे महत्त्व

मर्यादा पुरुषोत्तम म्हणून श्रीराम हे भारतीय संस्कृतीत सर्वात आदरणीय व्यक्तिमत्व आहे. राम हा कोट्यवधी भारतीयांचे आद्यदैवत आहे. रामरक्षा स्त्रोत्र हे अत्यंत प्रभावी, लोकप्रिय मानले जाते. यामध्ये प्रभू श्रीरामांचे स्मरण, त्यांचे गुणगान करत कृपा भाकली जाते. सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण मिळावे यासाठी रामरक्षा स्त्रोत्राचे पठण केले जाते. हे स्त्रोत्र दिव्य कवच मानले जाते.

रामरक्षा स्त्रोत्र पठण केल्यास मनःशांती, आत्मविश्वास, धैर्य मिळत असल्याचा दावा करण्यात येतो. मनुष्याचे संरक्षण करण्याचे, स्त्रोत्रपाठकाचे संरक्षण करण्याचे, कान, नाक, डोळे, डोके, हृदय, हात, पाय अशा सर्व अवयवांचे संरक्षण करण्याचे तसेच कोणत्याही बाधेपासून वाचवण्याचे, जीवनातील दु:ख संपवण्याचे आणि सुख-समृद्धीचे आवाहन स्त्रोत्रातून करण्यात येते.

रामरक्षा स्त्रोत्र लिहिले कोण?

‘अस्य श्रीरामरक्षास्त्रोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः’ अशी या स्त्रोत्राची सुरुवात होते. त्यातच हे स्त्रोत कोणी रचले याची माहिती देण्यात आली आहे. एका पौराणिक कथेनुसार, भगवान शंकरांनी बुधकौशिक ऋषी यांना रामरक्षा स्त्रोत सांगितले. त्यांनी ते जसेच्या तसे उतरवले. तर काही परंपरांनुसार, महर्षि विश्वमित्रांचेच एक नाव बुधकौशिक असल्याचे मानले जाते. पण या स्त्रोतच बुधकौशिक ऋषी असा उल्लेख असल्याने यासंबंधी वाद नाही.

कधी करावे रामरक्षा स्त्रोत्राचे पठण?

अनेक घरात आजही दिवेलागणीच्या वेळी रामरक्षा स्त्रोत्र म्हणण्याची परंपरा आहे. संध्याकाळी घरातील सर्व मंडळी एकत्र येत रामरक्षा म्हटली जाते. देवघरासमोर, श्रीरामाच्या प्रतिमा, फोटोसमोर अथवा योग्य दिशेकडे तोंड करून रामरक्षा म्हटली जाते. सकाळी, प्रवासातही रामरक्षा म्हटली जाते. रामनवमीला रामरक्षा स्त्रोत्राचे अनेकजण पठण करतात. अथवा मंगळवारी आणि शनिवारी सुद्धा हनुमानाच्या मंदिरात जात रामरक्षा म्हटली जाते. भीती, चिंता, मानसिक अशांतता, शारीरिक व्याधी असताना रामरक्षा स्त्रोत्र पठण करणे लाभादायक मानले जाते.

(डिस्क्लेमर: विविध धार्मिक ग्रंथ, मान्यतेवर आधारीत माहिती, टीव्ही 9 मराठी कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही. त्याला दुजोरा देत नाही.)

Follow Us