IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वनडे मॅच खेळलाही नाही तरीही हर्षित राणा कसा ठरला व्हिलन? मोठं कारण समोर
भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या मालिकेत आता शेवटचा एक सामना शिल्लक आहे. आता

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आणि एक शेवटचा सामना शिल्लक आहे. आता सध्या दोन्ही संघाकडे 1-1 अशी गुण आहेत. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ शेवटच्या सामना जिंकायचा अतोनात प्रयत्न करेल. आता भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे जवळपास पाच महिने मैदानाबाहेर असलेला हर्षित, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी संघात परतला होता, पण दौऱ्याच्या मध्यातच तो जखमी झाला आणि त्याला बाहेर बसावे लागले. आता हर्षितने सामना न खेळता तो कसा काय भारतीय संघाच्या पराभवाचे कारण ठरु शकतो ते जाणून घ्या…
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यादरम्यान हर्षित राणा जखमी झाला होता. त्याच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला ताण आल्यामुळे त्याला त्या मालिकेतून बाहेर बसावे लागले. या दुखापतीचा परिणाम सुरूच राहिला आणि त्याला एकदिवसीय मालिकाही सोडावी लागली. सहा महिन्यांतील हर्षितची ही दुसरी दुखापत आहे, परंतु मागील विश्रांती हे या नवीन दुखापतीमागील प्रमुख कारण ठरत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत पीटीआयच्या एका अहवालात असे उघड झाले आहे की, हर्षित जेव्हा त्याच्या मागील दुखापतीतून परतला होता, तेव्हा त्याचे वजन लक्षणीयरीत्या वाढले होते. फेब्रुवारीमध्ये टी-20 विश्वचषकाच्या सराव सामन्यादरम्यान त्याला गुडघ्याची दुखापत झाली, ज्यामुळे तो स्पर्धेतून आणि त्यानंतर आयपीएल 2026 मधून बाहेर पडला.
अहवालानुसार, आयर्लंड दौऱ्यावरून संघात परतल्यावर राणाचे वजन वाढले होते. यामुळेच त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, ज्यामुळे तो संपूर्ण दौऱ्यात केवळ पाचच सामने खेळू शकला. तो कधी परत येईल हे सध्या अस्पष्ट आहे. ही भारतीय संघ, निवड समिती आणि बीसीसीआयसाठी स्पष्टपणे चिंतेची बाब आहे, कारण पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी हर्षितला महत्त्वपूर्ण मानले जाते. शिवाय, यामुळे हर्षितच्या फिटनेस शिस्तीवर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण होते, कारण आपले वजन नियंत्रित ठेवणे ही त्याची जबाबदारी आहे. जर या परिस्थितीत बदल झाला नाही, तर हर्षितला संघात आपले स्थान टिकवून ठेवणे कठीण होऊ शकते.
