टॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी! मोहसिन नकवी कधीपर्यंत राहणार ACC अध्यक्ष? समोर आली अशी माहिती
'टॉफी वादा'च्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचेप्रमुख मोहसिन नक्वी यांच्या अध्यक्षपदाची उलट गणती सुरू झाली. आशिया कप 2027 स्पर्धेपूर्वी त्यांच्या पदाचा निकाल लागणार आहे.

आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांची पुरती लाज काढली आहे. त्याला कारणही तसंच आहे. भारताने पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे राजनैतिक आणि क्रीडा संबंध तोडले आहेत. मोहसिन नकवी हे केवळ पीसीबीचे अध्यक्ष नसून ते पाकिस्तान सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्री देखील आहेत. त्यामुळे दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाच्या मंत्र्याकडून कोणत्याही प्रकारचा बहुमान स्वीकारायचा नाही, अशी कडक आणि राष्ट्रभक्तीची भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. भारतीय महिला संघाने जेतेपद मिळवल्यानंतर त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास मनाई केली. भारतीय पुरुष आणि महिला संघाने आशिया कप जिंकूनही त्यांच्या हातून ट्रॉफी न स्वीकारल्यामुळे सध्या क्रिकेट जगतात ‘टॉफी वाद’ पेटला आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर आता मोहसिन नकवी यांची एसीसी अध्यक्षपदावरून उलट गणती सुरू झाली आहे.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशिया कप जिंकल्यावर मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. आता नुकत्याच पार पडलेल्या महिला टी20 आशिया कप 2026 च्या फायनलमध्ये श्रीलंकेला धूळ चारून नवव्यांदा ऐतिहासिक विजेतेपद मिळवल्यानंतर, भारतीय महिला संघानेही नकवी यांच्याकडून ट्रॉफी किंवा प्राइज मनी न घेता पुरुषांच्या त्याच निर्णयाची पुनरावृत्ती केली. भारतीय संघाच्या या आक्रमक भूमिकेमुळे नक्वी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.
कधी संपणार मोहसिन नक्वींचा कार्यकाळ?
मोहसिन नक्वी यांनी 3 एप्रिल 2025 रोजी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. एसीसीच्या नियमावलीनुसार, अध्यक्षांची निवड ही दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. त्यानुसार मोहसिन नक्वी यांचा कार्यकाळ एप्रिल 2027 मध्ये अधिकृतपणे संपणार आहे. याचा अर्थ असा की आता त्यांच्याकडे या पदावर राहण्यासाठी केवळ 7 महिने शिल्लक आहेत. नकवी यांना एप्रिल 2027 नंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची किंवा हे पद मिळण्याची शक्यता पूर्णपणे संपुष्टात आली आहे; कारण एसीसीचे अध्यक्षपद हे ‘रोटेशन पॉलिसी’ म्हणजेच आळीपाळीच्या धोरणानुसार चालते. या नियमांतर्गत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांच्या प्रतिनिधींना आळीपाळीने दोन वर्षांसाठी अध्यक्षपद दिले जाते.
पुढील आशिया कप क्रिकेट स्पर्धा मे 2027 मध्ये आयोजित केली जाणार आहे. ही स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये असणार आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची स्पर्धा असणार आहे. पण या स्पर्धेपर्यंत रोटेशन पॉलिसीनुसार मोहसिन नकवी एसीसीच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले असतील. त्यामुळे पुढील आशिया कपमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानच्या कोणत्याही मंत्र्याकडून ट्रॉफी नाकारण्याची किंवा विरोध करण्याची गरज पडणार नाही, कारण तोपर्यंत एसीसीला नवा अध्यक्ष मिळालेला असेल.
