MI vs CSK : ‘मी असा माणूस नाही, ज्याला हे बोलायला ..’, पाचवी मॅच हरल्यानंतर हार्दिक पंड्या जे खरं आहे ते बोलला
MI vs CSK IPL 2026 Match : मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 चा सीजन खूप खराब ठरला आहे. काल चेन्नई सुपर किंग्सने मुंबईला हरवलं. ते सुद्धा घरच्या मैदानात. या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पंड्याने काही गोष्टी कबूल केल्या. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच सामने गमावले आहेत.

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सला काल पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा तब्बल 103 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच वानखेडे स्टेडियमवर पराभवाची हॅटट्रिक केली. मुंबईच्या पाचव्या पराभवानंतर हार्दिक पंड्याचं निराश होणं स्वाभाविक आहे. कारण मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफ मध्ये दाखल होण्याचा मार्ग अजून खडतर बनलाय. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम शेवटून तिसऱ्या स्थानावर आहे. कदाचित यापुढे पॉइंट्स टेबलमध्ये रँकिंग सुधारणं हेच मुंबई इंडियन्स समोरच टार्गेट असू शकतं. मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याने प्रामाणिकपणे काही गोष्टी कबूल केल्या. हार्दिकने संजू सॅमसनच्या शतकी खेळीचं कौतुक केलं. गोलंदाजांनी खासकरुन फिरकी बॉलर्सनी चांगली गोलंदाजी केली. पण संजू सॅमसनच्या झंझावातासमोर आम्ही कमी पडलो हे हार्दिकने मान्य केलं.
संजू सॅमसनने आयपीएलमधील दुसरं शतक झळकवलं. त्याने 54 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. यात 10 फोर आणि सहा सिक्स आहेत. 187.04 च्या स्ट्राइक रेटने संजूने फलंदाजी केली. सीएसकेने 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 207 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा डाव 19 ओव्हर्समध्ये 104 धावांवर आटोपला. CSK ने 103 धावांनी विजयाची नोंद केली. पावरप्लेमध्ये तुम्ही लवकर विकेट गमावले तर परिस्थिती अवघड होऊन जाते असं हार्दिक म्हणाला.
तीच माती होती
आधीच्या तुलनते वानखेडेचा पीच आता वेगळा आहे, या चर्चा हार्दिकने फेटाळून लावल्या. “मी असं म्हणणार नाही. मी असा माणूस नाही, ज्याला हे बोलायला आवडेल. त्यांनी चांगली फलंदाजी केली. त्यांनी 207 धावा केल्या. पीच तोच होता. तीच माती होती. आम्ही चांगली फलंदाजी करायला पाहिजे होती” असं मॅच संपल्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला.
पण असं घडलं नाही
संजू सॅमसनच्या खेळाचं कौतुक करताना हार्दिक म्हणाला की, “मला असं वाटतं आमच्या स्पिनर्सनी चांगली बॉलिंग केली. पण संजू सर्वोत्तम खेळला. त्यांच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी योगदान देत संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं” “चांगल्या धावसंख्येपेक्षा आम्ही ती धावसंख्या चेज करणं जास्तं गरजेचं होतं. पावरप्लेमध्ये आम्ही चांगलं खेळायला हवं होतं, तर ती लय शेवटपर्यंत राहिली असती. पण असं घडलं नाही” असं हार्दिक पंड्या बोलला.
अजून उत्तम काय करता येईल ते पाहू
संघाच्या भविष्यातील योजना, प्लेइंग इलेव्हनमधील बदलांबद्दल हार्दिक म्हणाला की, “आम्ही या बद्दल चर्चा करु.काय करणं गरजेचं आहे ते ठरवू. आमच्याकडे काही दिवस आहेत. अजून उत्तम काय करता येईल ते पाहू”