आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद हुकल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने मन केलं मोकळं, म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे गुजरात टायटन्सचं दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने आपलं मन मोकळं केलं आणि काय चुकलं ते सांगितलं.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात गुजरात टायटन्सने विजयासाठी 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान आरसीबीने 5 गडी गमवून 18 व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यावर पूर्णपणे आरसीबीची पकड राहिली. नाणेफेकीचा कौल जिंकण्यापासून गोलंदाजी आणि फलंदाजीतही आरसीबी वरचढ ठरली. या सामन्यात गुजरात टायटन्स कुठे नव्हतं. हा सामना गुजरात टायटन्सच्या पावरप्लेपासून आरसीबीकडे झुकलेला दिसला. आरसीबीने पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात विजयासाठी धावांचा निम्मा पल्ला गाठला होता. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या पराभवाची स्क्रिप्ट आणखी पक्की झाली. आरसीबीच्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर दबाव वाढेल असं वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. विराट कोहली तर तुटून पडला आणि जेतेपद मिळवून दिलं. या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाला शुबमन गिल?
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही 180-190 धावांच्या जवळपास पोहोचलो असतो, तर सामना चांगला झाला असता. पहिल्या तीन-चार षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना चेंडू थोडा स्विंग मिळतो आणि सुरुवातीला दोन विकेट पडल्यानंतर आमची लय बिघडली. आम्ही पॉवरप्लेमध्ये 15-20 धावा दिल्या. मला वाटतं, आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या संघांपैकी एक होतो. पहिले दोन सामने गमावल्यानंतर आम्ही पुनरागमन केले. खूप आनंद झाला. आम्ही विजय मिळवू शकलो नाही, पण जरी आम्ही ट्रॉफी जिंकली असती तरी सुधारणेला वाव होताच.’
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यानेही विजेतेपदानंतर आपलं मन मोकळं केलं. रजत पाटीदार म्हणाला की, ‘खूप छान वाटत आहे. जेव्हा आम्ही इथे आलो, तेव्हा गेल्या वर्षीच्या खूप आठवणी ताज्या झाल्या. माझ्या भावना व्यक्त करायला शब्द नाहीत, पण खूप छान वाटत आहे. हे एक सुस्पष्ट नियोजन होते. जेव्हा आम्ही नाणेफेक जिंकलो, तेव्हा पाठलाग करणे सोपे झाले. भुवी, हेझलवुड, रासिख, केपी सुयश आणि शेफर्ड यांनी संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ती खरोखरच उत्कृष्ट होती. मी आरसीबीचा कर्णधार होण्याचे आणि ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. मला वाटते की हे नशिबातच लिहिले होते. त्यासाठी मी आभारी आहे. ‘