Asia Cup 2023 : टीम इंडियाच्या विजयामुळे पाकिस्तानला मोठा फायदा, वनडे वर्ल्डकपपूर्वी मिळाला असा दिलासा
Team India : आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीतच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं. पण भारताने आशिया कप जेतेपदावर नाव कोरतातच पाकिस्तानला फायदा झाला आहे. कसं आणि नेमकं काय झालं ते समजून घ्या

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. भारताने आठव्यांदा आशिया कप जिंकला आहे. मात्र भारताच्या जबरदस्त कामगिरीनंतर त्याचा फायदा पाकिस्तानला झाला आहे. कारण आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. आशिया कप फायनल आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यामुळे क्रमवारीत मोठा उलटफर झाला आहे. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानचा संघ पहिल्या स्थानावर, भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांची रेटिंग 115 आहे. मात्र खेळलेले सामने आणि विजयी टक्केवारीमुळे टीम इंडियाला फटका बसला आहे.
समान गुण असूनही भारत दुसऱ्या स्थानी का?
आशिया कप स्पर्धेचं जेतेपद मिळूनही भारत अव्वल स्थानी का नाही? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. पाकिस्तानने 27 सामन्यात 3102 पॉईंट्स मिळवले आहेत आणि रेटिंग 115 आहे. तर भारताने 41 सामन्यात 4701 पॉईंट्स मिळवले आहेत आणि 115 गुण आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने 28 सामन्यात 3166 पॉईंट्ससह 113 रेटिंग मिळवले आहेत. जेव्हा रेटिंग एकसारखी असते तेव्हा खेळलेल्या सामन्यांवरून क्रमवारी ठरवली जाते. या बाबतीत टीम इंडिया खूपच पाठी आहे.
ऑस्ट्रेलियाची एक नंबरवरून थेट तीन वर घसरण
दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी होता. पण पाच सामन्यांची वनडे मालिका 3-2 ने गमावल्याने फटका बसला आहे. शेवटच्या निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 122 धावांनी पराभूत केलं. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. मात्र यजमान दक्षिण आफ्रिकेने कमबॅक करत सलग तीन सामने जिंकले.
भारताला अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेपूर्वी भारताला पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी आहे. तसं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांना समान संध असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळला जाणार आहे.
