
ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय संघाला 5 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला होता. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमवून 251 धावा केल्या. तसेच विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 36.1 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवामुळे भारताच्या हातून वनडे मालिका गेली आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. त्यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात टाकली. त्यामुळे तिसरा सामना आता फक्त औपचारिक असणार आहे.
भारताकडून प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या जोडीने आश्वासक सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली. पण स्मृती मंधानाचा डाव 31 धावांवर आटोपला. त्यानंतर आलेली जेमिमा रॉड्रिग्सही काही खास करू शकली नाही. तिने 15 चेंडूत 11 धावा केल्या आणि बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात आली आणि सेट असलेल्या प्रतिका रावलची विकेट पडली. प्रतिका रावल 81 चेंडूत 52 धावांची खेळी करून बाद झाली. त्यानंतर हरमनप्रीत कौरने मोर्चा सांभाळला. तिने 70 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 54 धावा केल्या. दीप्ती शर्मा 1, अमनजोत कोर 13, ऋचा घोष 22, कश्वी गौतम 25, क्रांती गौड 19 धावा करून बाद झाले.
ऑस्ट्रेलियाकडून या धावांचा पाठलाग करण्यासाठी एलिसा हिली आणि फोइबे लिचफिल्ड ही जोडी मैदानात आली होती. पण संघाच्या 21 धावा असताना एलिसा हिली अवघ्या 6 धावांवर बाद झाली. त्यानंतर फोइबे लिचफिल्ड आणि जॉर्जिया वोल यांनी मोर्चा सांभाळला. दुसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागादारी केली. फोइबे लिचफिल्ड 80 धावा करून बाद झाली. त्यानंतर बेथ मूनीने जॉर्जिया वोलची साथ दिली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली आणि विजयाची स्क्रिप्ट लिहिली. जॉर्जिया वोल 101 धावा करून बाद झाली. पण तिथपर्यंत हा सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकला होता. शेवटी झालंही तसंच