संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय सीओई यांच्यात संवादाचा अभाव आहे का? गिल एका झटक्यात म्हणाला..
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून या दरम्यान बरंच काही घडलं आहे. खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघ निवडीत बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेन्स यांच्यात संवादाचा अभाव असल्याचं बोललं जात आहे. त्यावर आता कर्णधार शुबमन गिल याने थे भाष्य केलं.

श्रीलंका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. पण कसोटी मालिका तोंडावर येईपर्यंत दुखापतीमुळे तीन खेळाडूंना वगळण्यात आलं. जसप्रीत बुमराह, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर या कसोटी मालिकेला मुकले आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी आकिब नबी आणि साई सुदर्शनच्या जागी सरफराज खानला संघात संधी मिळाली आहे. पण आधी संघात निवड आणि नंतर दुखापतीमुळे डावलल्याने बराच गदारोळ झाला. संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयंच सेंटर ऑफ एक्सीलेंस यांच्यात संवादाचा अभाव असल्याच्या चर्चांना उधाण आलं. असं असताना भारत श्रीलंका कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. त्यावेळी त्याला या वादाबाबत विचारलं गेलं. तेव्हा त्याने या सर्व बातम्या चुकीच्या असून फेटाळून लावल्या.
संघ व्यवस्थापन आणि सीओईबाबत गिल काय म्हणाला?
शुबमन गिल म्हणाला की, ‘त्यांच्यासोबत आमचा सतत संवाद सुरू आहे. दुर्दैवाने साई सुदर्शनच्या खेळात आम्हाला हवी तशी सुधारणा झाली नाही. कसोटी सामन्यात आम्ही धोका पत्कारू शकत नाही. आम्हाला आमच्या निवडलेल्या 15 खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे.’ कसोटी सामन्याचा कालावधी मोठा असतो आणि पूर्णपणे फिट नसलेल्या खेळाडूच्या बाबतीत कोणताही धोका पत्कारणे परवडणारं नाही, असंही गिल पुढे म्हणाला. कसोटी सामना पाच दिवसांचा असतो, जर वनडे किंवा टी20 असता तर गोष्ट वेगळी असते. कसोटी सामन्यात धोका पत्कारण्यासारखं नसतं. पण इतर खेळाडूंना अधिक संधी मिळते, हे देखील तो सांगण्यास विसरला नाही.
‘भारतीय संघात अपेक्षित खेळाडू नाही म्हणून त्याचा संघाच्या मनोधैर्यावर फारसा परिणाम झाला नाही. आमच्या 15 जणांच्या संघात कोणीही असो किंवा आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये कोणालाही संधी देऊ शकतो. ते चांगली कामगिरी करून सामना जिंकू शकतात.’ असंही शुबमन गिल म्हणाला. संघात बदल झाले असले तरी, मालिकेपूर्वी भारताची पुरेशी तयारी झाली आहे, असंही तो सांगण्यास विसरला नाही. कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी 10 दिवस मिळाले त्याचा टिम इंडियाला नक्कीच फायदा होईल, असंही तो पुढे म्हणाला.