मला पण चूक करण्याचा हक्क आहे..! गौतम गंभीरने असं सांगत पुढच्या स्वप्नाचा केला खुलासा

गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर भारताने दोन आयसीसी चषक जिंकले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. असं असताना गौतम गंभीरचं एक विधान चर्चेत आलं आहे.

मला पण चूक करण्याचा हक्क आहे..! गौतम गंभीरने असं सांगत पुढच्या स्वप्नाचा केला खुलासा
मला पण चूक करण्याचा हक्क आहे..! गौतम गंभीरने असं सांगत पुढच्या स्वप्नाचा केला खुलासा
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 16, 2026 | 3:34 PM

गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यापासून या ना त्या कारणाने चर्चा होत असते. राहुल द्रविडने टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर प्रशिक्षकपद सोडलं. यानंतर ही सूत्र गौतम गंभीरच्या हातात आली. त्यानंतर या दीड वर्षांच्या कालावधीत अनेक चढउतार टीम इंडियाच्या वाटेला आहे. अनेकदा टीकाकारांनी अपयशासाठी गौतम गंभीरला लक्ष्य केलं आहे. त्याच्या निर्णयावरून अनेकदा सोशल मीडियावर रान उठवलं. पण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकल्यानंतर गौतम गंभीरने टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. जेतेपदानंतर गौतम गंभीरने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. गौतम गंभीर म्हणाला की, ‘मी पण माणूस आहे. मलाही चूक करण्याचा हक्क आहे. सर्वांना चूक करण्याचा अधिकार आहे. खेळाडू करतात, मी करतो. मागच्या 18 महिन्यात मी अनेक चुका केल्या आहेत.’ इतकंच काय तर गौतम गंभीरने पुढे सांगितलं की, जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल आणि चूक झाली तर त्यात काहीच अडचण नाही.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेदरम्यान गौतम गंभीरने आपल्या खेळाडूंना पाठिंबा दिला. सूर्यकुमार यादव फॉर्मात नव्हता. अभिषेक शर्माने फॉर्म गमावला होता. पण गौतम गंभीरने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला. टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘मी त्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वांशी प्रामाणिक होतो. मी प्रत्येक खेळाडूसोबत प्रामाणिकपणे चर्चा केली. मी सर्वांसोबत डोळ्यात डोळे घालून बोलतो. पुढच्या 18 महिन्यांचा जितका कार्यकाळ शिल्लक आहे, तेव्हाही मी असंच करणार आहे.’

गौतम गंभीर म्हणाला की, ‘तुम्ही तुमच्या खेळाडूंवरील विश्वास 3-4 सामन्यात गमवू शकत नाहीत. लोकांना आउट फॉर्म आणि आऊट ऑफ रनमधील फरक कळत नाही. अभिषेक शर्मा आऊट ऑफ फॉर्म नव्हता.’ गौतम गंभीरने संजू सॅमसनवरही विश्वास ठेवला आणि इशान किशनच्या जागी अभिषेक शर्मासोबत ओपनिंग पाठवलं. त्याने या संधीचं सोनं केलं आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळवला. इतकंच काय तर टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. गौतम गंभीरने REVZSPORTZशी बोलताना सांगितलं की, ‘मला ऑलिम्पिकचा भाग व्हायचं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी अभिमानाचा क्षण ्सेल.’

Follow Us