Ashish Nehra ला T20 टीमच कोच बनवा, प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूची मागणी
कॅप्टनशिपसाठी 'या' खेळाडूला दिलं समर्थन
नवी दिल्ली: टीम इंडियाचा काल T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला. इंग्लंडकडून टीम इंडियाला लज्जास्पद पराभव स्वीकारावा लागला. या दारुण पराभवामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये संतापाची भावना आहे. माजी क्रिकेटपटूंच्या भावना सुद्धा यापेक्षा वेगळ्या नाहीत. सेमीफायनलमधील पराभवानंतर टीम इंडियातील बदलांबाबत वेगवेगळ्या मागण्या सुरु झाल्या आहेत.
कॅप्टनशिपसाठी ‘या’ खेळाडूला पाठिंबा
सेमीफायनलमधील पराभवानंतर टी 20 टीमच्या कॅप्टनशिपबदलाची चर्चा सुरु झालीय. रोहितच्या जागी कॅप्टनशिपसाठी हार्दिक पंड्याच नाव आघाडीवर आहे. हार्दिक पंड्याला टी 20 टीमचं कॅप्टन बनवण्याची मागणी होत आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी टी 20 टीमच्या कॅप्टनशिपसाठी हार्दिक पंड्याला पाठिंबा दिलाय.
टीममध्ये त्याच्यासारख्या प्लेयर्सची गरज
“T20 टीमच्या कॅप्टनशिपसाठी हार्दिक पंड्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाहीय. कॅप्टनशिपसाठी हार्दिक पंड्याला माझी पसंती आहे. तो सर्वोत्तम खेळाडू आहे. टीममध्ये त्याच्यासारख्या प्लेयर्सची गरज आहे” असं हरभजन सिंह इंडिया टुडेवर बोलताना म्हणाले.
राहुल द्रविड यांच्याबद्दल मला आदर
टी 20 मधून नुकतच निवृत्त झालेल्या खेळाडूला कोचिंग स्टाफवर घ्यावं, असं मत हरभजनने व्यक्त केलं. “फक्त कॅप्टनच नाही, नुकतच टी 20 मधून निवृत्त झालेल्या खेळाडूला तुम्ही कोचिग स्टाफमध्ये घेऊ शकता, ज्यांना फॉर्मेटची समज आहे” असं हरभजन म्हणाला. “राहुल द्रविड यांच्याबद्दल मला आदर आहे. ते माझे सहकारी होते. आम्ही दोघे एकत्र बरच क्रिकेट खेळलोय. ते हुशार आहेत” असं हरभजन म्हणाला.
आशिष नेहरा यांचं नाव सुचवलं
हरभजन सिंहने कोचपदासाठी आशिष नेहरा यांचं नाव सुचवलं. “तुम्हाला राहुल द्रविड यांना टी 20 कोच पदावरुन हटवायचं नसेल, तर त्यांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतच निवृत्त झालेल्या एका खेळाडूची नियुक्ती करा. आशिष नेहरा यांना क्रिकेटची चांगली समज आहे, ते हुशार आहेत. गुजरात टायटन्समध्ये त्यांनी काय केलं? ते आपल्या सर्वांना माहितीय” असं हरभजन सिंग म्हणाले.