
बांगलादेश ए क्रिकेट टीमने आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली आहे. बांगलादेशने भारतावर सुपर ओव्हरमध्ये मात करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. बांगलादेशने भारताला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने जोरदार झुंज दिली. भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावांची गरज होती. मात्र रिपोन मंडळ याने 15 धावा दिल्या. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी सुपर ओव्हरमध्ये निराशा केली. रिपोन मंडल याने भारताला खातंही उघडून दिलं नाही. रिपोनने भारताच्या दोन्ही फलंदाजांना झिरोवर आऊट केलं. त्यामुळे बांगलादेशला फक्त 1 धावांची गरज होती. बांगलादेशने 1 धाव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारताचं आव्हान पराभवासह संपुष्टात आलं.
टीम इंडियाने टॉस जिंकला. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. बांगलादेशला 190 पार पोहचवण्यात ओपनर हबीबूर सोहन आणि एसएम मेहरुब या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली. हबीबूरने 46 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 3 फोरसह 65 रन्स केल्या. तर अखेरच्या क्षणी 18 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने 48 धावांची खेळी करत फिनीशिंग टच दिला. भारताचे गोलंदाज बांगलादेशला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले. भारतासाठी गुरजनप्रीत सिंह याने 2 विकेट्स घेतल्या. तर चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्यानंतरही भारताला बांगलादेशला रोखता आलं नाही.
वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या या सलामी जोडीने भारताला विस्फोटक सुरुवात करुन दिली. या दोघांनी चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र वैभव सूर्यवंशी आऊट होताच 53 धावांची भागीदारी मोडीत निघाली. वैभवने अवघ्या 15 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 38 रन्स केल्या. भारताने त्यानंतर 13 धावांनी दुसरी विकेट गमावली. नमन धीर स्वस्तात माघारी परतला. नमन 7 रन्सवर आऊट झाला. कॅप्टन जितेश शर्मा आणि प्रियांश आर्या या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 19 बॉलमध्ये 32 रन्स जोडल्या. प्रियांशने 23 बॉलमध्ये 44 धावांची खेळी केली.
जितेश शर्मा आणि नेहल वढेरा या जोडीने 33 बॉलमध्ये 52 रन्स जोडल्या. जितेशने 33 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. जितेशनंतर रमनदीप 17 धावांवर बाद झाला. रमनदीप आऊट झाल्यानंतर नेहल वढेरा याची साथ देण्यासाठी आशुतोष शर्मा मैदानात आला. या दोघांनी भारताच्या विजयाची आशा कायम राखली. भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज होती. 20 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर आशुतोष शर्मा 6 बॉलमध्ये 13 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे आता भारताला शेवटच्या बॉलवर 4 धावांची गरज होती. हर्ष दुबे याने शेवटच्या चेंडूवर 3 धावा केल्या. त्यामुळे दोन्ही संघांच्या धावा समसमान झाल्या. त्यामुळे सामना बरोबरीत राहिला.
रिपोन मंडळ याने सुपर ओव्हरमध्ये भारताच्या फलंदाजांना भोपळाही फोडून दिला नाही. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 1 धावेचीच गरज होती. सुयश शर्मा याने बांगलादेशच्या फलंदाजाला आऊट केलं. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 1 धाव हवी होती. तर भारताला सुपर ओव्हर टाय करण्यासाठी 1 विकेटची गरज होती. मात्र सूर्यश शर्मा याने वाईड बॉल टाकला. यासह बांगलादेशने सामना जिंकला.