IND vs ENG : विराट कोहली लॉर्ड्सवर आपल्या कारकिर्दीतील राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार का?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 19 जुलैला लॉर्ड्सवर होणार आहे. हा सामना विराट कोहलीसाठी खास असणार आहे. या मैदानात विराट कोहलीचं शतकी खेळी करण्याचं स्वप्न अजूनही अपूर्ण आहे.

भारत आणि इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे 19 जुलैला ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळला जाणारा सामना खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका खिशात घालणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. कारण भारताने या मैदानात शेवटचा सामना 2004 साली म्हणजेच 22 वर्षापूर्वी जिंकला होता. त्यामुळे या सामन्यात सांघिक खेळ अपेक्षित आहे. असं असताना भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या विराट कोहलीकडून या मैदानात चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. विराट कोहलीने या सामन्यात चांगली कामगिरी केली तर नक्कीच संघाला विजय मिळेल.
टीम इंडियाला विजयी मिळवण्यासाठी विराट कोहलीची खेळी महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे, लॉर्ड्सवर शतक ठोकण्यात यशस्वी झाला तर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील न साकार झालेले स्वप्न पूर्ण करेल. विराट कोहलीने जगभरातील बहुतांश स्टेडियममध्ये शतकी खेळी केली आहे. पण क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स मैदानात अद्याप एकही शतक झळकवू शकलेला नाही. इतकंच काय तर त्याला अर्धशतकही ठोकता आलेलं नाही. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे.
विराट कोहलीची लॉर्ड्सवरी कामगिरी काही खास नाही. जगभरात आपल्या फलंदाजीने त्याने अनेक विक्रम मोडले आणि रचले आहेत. पण लॉर्ड्सवर त्याचं काही चाललं नाही. विराट कोहली लॉर्ड्सवर 9 सामने खेळला आहे. पण या 9 डावात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलेलं नाही. या मैदानावर विराट कोहलीची फलंदाजीची सरासरी 22.66 ची आहे. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे.
विराट कोहली या मैदानता एकूण तीन वनडे सामने खेळले आहे. त्यात त्याने 25.66 च्या सरासरीने 77 धावा केल्या आहेत. यात 45 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तीन कसोटी सामन्यात त्याने 21.16 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत. यातही 42 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यात एकदा त्याला खातंही खोलता आलं नाही. लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड हे एकमेव मैदान आहे जिथे विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तीनपेक्षा जास्त डाव खेळला आहे आणि एकदाही 50 धावांचा टप्पा ओलांडला नाही.