
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता इतर सर्व सामन्यात जबरदस्त कामगिरी करुन आपण गतविजेता का आहोत हे दाखवून दिलं. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20I वर्ल्ड कप जिंकला होता. आता टीम इंडिया सलग दुसरा वर्ल्ड कप जिंकण्यापासून 2 पाऊलं दूर आहे. टीम इंडियाने साखळीनंतर सुपर 8 फेरीत जबरदस्त अशी कामगिरी करुन दाखवली. त्यानंतर आता गुरुवारी 5 मार्च रोजी टीम इंडिया फायलनचं तिकीट मिळवण्यासाठी इंग्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्केल याने अभिषेक शर्मा याच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मॉर्ने नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
अभिषेक शर्मा याला धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत एका अर्धशतकाचा अपवाद वगळता अभिषेकला काही खास करता आलं नाही. अभिषेक शर्मा या स्पर्धेत सलग आणि एकूण 3 वेळा झिरोवर आऊट झालाय. त्यामुळे अभिषेकला इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीतून वगळण्यात येऊ शकतं. अशात इंग्लंड विरुद्ध सामन्याच्या पूर्वसंध्येला मॉर्नेने पत्रकार परिषदेला संबोधित करताना यावर भाष्य केलं.
अभिषेकने आतापर्यंत या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 6 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यापैकी 3 डावांत तो झिरोवर आऊट झालाय. तर उर्वरित 3 डावांत त्याने 80 धावा केल्या. तर अभिषेकने एकमेव अर्धशतक हे झिंबाब्वे विरुद्ध झळकावलंय.
मॉर्नेने अभिषेकच्या कामगिरीवर भाष्य करताना संजू सॅमसन याचा उदाहरण दिलं.”संजूने देशील या परिस्थितीचा सामना केला आहे. त्यामुळे अभिषेकसाठी ही शिकण्यासाठी योग्य वेळ आहे. अभिषेकसाठी उद्याचा सामना हा नवी सुरुवात असेल. फक्त त्याला जाऊन कमाल करायची आहे”, असं मॉर्नेने स्पष्ट केलं. मॉर्नेची ही प्रतिक्रिया पाहता अभिषेक इंग्लंड विरूद्धच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कायम असेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.