
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडिया आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील उपांत्य फेरीतील सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. हॅरी ब्रूक याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. अशात आता टीम इंडिया कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या घरच्या मैदानात किती धावांचा डोंगर उभारणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडियाकडून या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कॅप्टन सूर्या आणि टीम मॅनेजमेंटने रिंकु सिंह, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज या चौघांना बाहेर ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तर इंग्लंडने एकमेव बदल केला आहे. इंग्लंडने रेहान अहमद याला बाहेर केलं आहे. तर जेमी ओव्हरटन याला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग तिसरी तर इंग्लंडची सलग पाचवी वेळ आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे आता हा सामना जिंकून कोणता संघ तिसऱ्या वर्ल्ड कप ट्रॉफीच्या जवळ पोहचणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टी 20I क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 29 सामने खेळले आहेत. भारताने 29 पैकी सर्वाधिक 17 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील हा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सहावा सामना आहे. याआधी झालेल्या 5 पैकी 3 सामन्यांत टीम इंडियाने इंग्लंडवर विजय मिळवला आहे. तर इंग्लंडला भारतावर 2 सामन्यांत मात करता आली आहे.
यंदाच्या आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत वानखेडे स्टेडियममध्ये एकूण 4 पैकी 3 सामन्यांत विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहेत. तर एकदाच पहिल्या डावात बॅटिंग करणारा संघ जिंकला आहे. तर या मैदानातील सरासरी धावसंख्या ही 174 इतकी आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर),अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह