
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आणि हेड कोच गौतम गंभीर याच्या मागदर्शनात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडिया आता वर्ल्ड चॅम्पियन होण्यापासून एक विजयाने दूर आहे. टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. हा सामना रविवारी 8 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारताला इथवर पोहचवण्यात कोचिंग स्टाफने कठोर मेहनत घेतली आहे. हेड कोच गौतम गंभीर कशाप्रकारे आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करतो हे क्रिकेट चाहत्यांना चांगलंच ठाऊक आहे.
गंभीर जरी शांत असला तरी आक्रमक आहे. गंभीर डग आऊटमध्ये बसून मैदानाबाहेरून खेळ चालवतो. गंभीर आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून मैदानात मेसेज पोहचवतो. गंभीरची ही रणनिती अनेकदा यशस्वी ठरलीय. मात्र या महाअंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिलेल्या प्रतिक्रियेमळे गंभीरची चांगलीच चर्चा रंगली आहे. सूर्याने गंभीरबाबत असं काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
गौतम गंभीरचं चाललं तर तो बँटिंगसाठी मैदानात उतरु शकतो, असं सूर्याने अहमदाबादमध्ये महाअंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. गंभीरने या अंतिम सामन्यासाठी कशाप्रकारे तयारी केलीय आणि करुन घेतलीय हे दाखवून देण्यासाठी सूर्याने अशी प्रतिक्रिया दिली.
सूर्यकुमार यादव याला पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या अंदाजाबाबत आणि खेळण्याच्या पद्धतीवरुन प्रश्न करण्यात आला. यावर सूर्या म्हणाला की कोच गंभीरने प्रत्येक खेळाडूला महत्त्व देत वैयक्तिक कामगिरीला फाटा दिला आहे.
“जर कोच गंभीरवर सोपवलं तर तो स्वत: पॅड बांधून मैदानात उतरेल. कारण सर्वांना विजयात काही न काही योगदान द्यायचं हा त्यांचा मंत्रा आहे”, असं सूर्या म्हणाला. सूर्याने गंभीर कशाप्रकारे विचार करतो याबाबत पत्रकार परिषदेत भाष्य केलं. गंभीरसाठी दुसऱ्याने केलेली छोटेखानी खेळी ही शतकाच्या बरोबरीची असते, असं सूर्याने सांगितलं.
दरम्यान गौतम गंभीर याने टीम इंडियाचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी 20i सामने खेळला आहे. गंभीरने कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 4 हजार 154, 5 हजार 238 आणि 932 अशा धावा केल्या आहेत.