IND vs SA: फक्त किंग कोहलीच नव्हे, हे खेळाडूही ठरले भारताच्या शानदार विजयाचे हिरो

Team Indias Victory Hero : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. विराट कोहली व्यतिरिक्त इतरही अनेक खेळाडूंनी संघाच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली.

IND vs SA: फक्त किंग कोहलीच नव्हे, हे खेळाडूही ठरले भारताच्या शानदार विजयाचे हिरो
IND vs SA 1st ODI
| Updated on: Nov 30, 2025 | 11:11 PM

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 349 धावा केल्या होत्या. याला उत्तर देताना आफ्रिकन संघाने सर्वबाद 332 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. मात्र कोहली व्यतिरिक्त इतरही अनेक खेळाडूंनी संघाच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली. यामुळे भारताला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली आहे. भारतीय संघाच्या विजयाचे हिरो कोण होते ते जाणून घेऊयात.

विराट कोहलीने शानदार शतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात थोडी खराब झाली. यशस्वी जयस्वाल केवळ 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने सावध सुरुवात केली आणि नंतर आक्रमक फटकेबाजी करत 102 चेंडूत शतक झळकावले. शतकानंतरही त्याने फटकेबाजी सुरू ठेवली. कोहलीने या सामन्यात 120 चेंडूत 11 चौकार आणि 7 षटकारांसह 135 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने 349 धावा केल्या.

हर्षित राणा आणि कुलदीप यादवची शानदार गोलंदाजी

हर्षित राणाने भारताला गोलंदाजीत शानदार सुरुवात करून दिली. त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये रायन रिकल्टन आणि क्विंटन डी कॉकला बाद करत सलग दोन धक्के दिले. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर गेला होता. त्यानंतर कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचे कंबरडे मोडले. त्याने 10 षटकांत चार विकेट घेतल्या. त्याने मॅथ्यू ब्रेज्टके, टोनी डी जॉर्गी, मार्को जॅन्सेन आणि प्रेनेलन सुब्रायन यांना बाद केले. हर्षित राणा आणि कुलदीर यादवही भारताच्या विजयाचे हिरो ठरले.

भारताची मालिकेत 1-0 अशी आघाडी

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 349 धावांचा डोंगर उभा केला होता. विराटच्या शतकाशिवाय रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनीही संघासाठी अर्धशतके झळकावली. रोहितने 57 आणि राहुलने 60 धावांची खेळी केली. त्यामुळे भारत मोठी धावसंख्या उभारू शकला. एकंदरीत विराट कोहली, कुलदीप यादव, हर्षित राणा, रोहित शर्मा आणि कर्णधार केएल राहुल हे खेळाडू भारताच्या विजयाचे हिरो ठरले. या खेळाडूंमुळे भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.