IND vs ZIM: भारताने मालिका जिंकली, तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काय बदलणार? श्रेयस अय्यर म्हणाला…
भारताने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. असं असताना तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काही बदल करणार का? या प्रश्नावर श्रेयस अय्यरने उत्तर दिलं आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेचा निकाल दुसऱ्या सामन्यानंतरच लागला आहे. बारताने दुसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला 90 धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर भारताने तीन सामन्यांची मालिका सलग दोन सामने जिंकून 2-0 ने जिंकली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. या सामन्यात काही बदल करण्याची शक्यता वाढली आहे. कारण गेल्या काही सामन्यात अभिषेक शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. पण गोलंदाजी त्याने तीन विकेट काढल्याने त्याला बसवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात 24 तासाहून कमी अवधी शिल्लक असताना काय बदल करणार? असा समालोचकांनी श्रेयस अय्यरला विचारला. यावेळी त्याने एका खेळाडूच्या दुखापतीची माहिती दिली आणि संघात एक दोन बदल होतील असे संकेत दिले.
तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग 11 बदलणार!
पहिल्या टी20 सामन्यातील प्लेइंग 11 मध्ये एक बदल करत दुसरा सामना खेळला गेला. अशोक शर्माच्या जागी यश ठाकुरला संधी देण्यात आली. आता तिसऱ्या टी20 सामन्यात बदल होणार असे संकेत श्रेयस अय्यरने दिले आहे. दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही आणि मी प्रशिक्षकांशी बोललो नाही. दुर्दैवाने, आमच्या एका खेळाडूला (प्रिन्स) दुखापत झाली आहे, त्यामुळे एक-दोन बदल होऊ शकतात.’ त्यामुळे प्रिन्सच्या जागी अशोक शर्माला पुन्हा संधी मिळू शकते. तर अभिषेक शर्माच्या जागी प्रभसिमरन सिंग खेळणार का? हा देखील प्रश्न आहे.
दुसऱ्या सामन्यातील विजयाबाबत काय म्हणाला?
श्रेयस अय्यर विजयाचं विश्लेषण करत म्हणाला की, ‘फलंदाजीपासून सुरुवात करायची झाल्यास, मला वाटते की इशान आणि तिलक ज्याप्रकारे खेळले ते उत्कृष्ट होते. सुरुवातीला मला वाटले होते की 180 ते 200 च्या दरम्यानची धावसंख्या एक सरासरी धावसंख्या असेल, पण आम्ही 220 धावा केल्या, जी म्हणजे सोन्यावरचा मुलामा होता. त्या दोघांचेही योगदान उत्कृष्ट होते. मग, गोलंदाजीमध्ये, नेहमीप्रमाणे गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि दिशा साधत संघाला 130 धावांवर गुंडाळले. मला वाटते की हेच तुम्हाला खेळाची कहाणी सांगते.’
श्रेयस अय्यरने या मालिकेत निर्भयपणे खेळण्याचा आधीच कानमंत्र दिला होता. त्यावर श्रेयस अय्यर पुन्हा व्यक्त होत म्हणाला की, खेळाकडे असेच पाहिले पाहिजे. मला वाटते की हे सर्व वृत्तीवर अवलंबून आहे. मागील कामगिरीवर जास्त विचार करत बसू नका. पुढे जात राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वर्तमानात राहा. तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. उद्या आणखी एक संधी आहे, त्यामुळे आम्ही त्यासाठी उत्सुक आहोत.