
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 20 फेब्रुवारीला साखळी फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कॅनडा आमनेसामने असणार आहेत. त्यानंतर शनिवार 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सुपर 8 साठी प्रवेश मिळवला आहे. टीम इंडिया सुपर 8 फेरीसाठी ए ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये टीम इंडिया व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिंबाब्वेचा समावेश आहे. टीम इंडियासह वरील 4 संघ हे साखळी फेरीत अजिंक्य राहिलेत. झिंबाब्वे व्यतिरिक्त इतर 3 संघांनी साखळी फेरीतील सर्व 4 सामने जिंकले आहेत. तर झिंबाब्वेने 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. झिंबाब्वेचा 1 सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला होता.
साखळी फेरीतील ए ग्रुपमधील हे 4 संघ अजिंक्य आहेत. त्यामुळे हा गट ग्रुप ऑफ डेथ झाला आहे. या निमित्ताने 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना योगायोग पाहायला मिळाला आहे. या योगायोगामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज सुपर 8 फेरीत एकत्र येण्याची दुसरी वेळ ठरली आहे. याआधी तिन्ही संघ 2009 साली झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 8 फेरीत एकत्र होते. टीम इंडियाला 2009 साली सुपर 8 मधील तिन्ही सामने गमवावे लागले होते.
तेव्हा विंडीजने भारतावर 7 विकेट्सने मात केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 12 धावांनी मात केली होती. तर इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध 3 धावांनी मैदान मारलं होतं. सलग 3 पराभवांमुळे भारतीय संघाला तेव्हा स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं. तेव्हा टीम इंडिया गतविजेता होती. त्यामुळे भारतीय संघासाठी तो मोठा झटका होता.
त्यानंतर आता तिन्ही संघ सुपर 8 फेरीत एकत्र आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. मात्र आता टीम इंडिया अजिंक्य आहे. टीम इंडियासमोर आता सुपर 8 फेरीत झिंबाब्वेचं आव्हान असणार आहे. झिंबाब्वेने या मोहिमेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभवाचा झटका दिला आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर सुपर 8 मध्ये झिंबाब्वेचंही कडवं आव्हान असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 22 फेब्रुवारी, अहमदाबाद
टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे, 26 फेब्रुवारी, चेन्नई
टीम इंडिया विरुद्ध विंडीज, 1 मार्च, कोलकाता