Mock Drill in India: कोलकाता चेन्नई आयपीएल सामना संकटात? ब्लॅकआऊट झालं तर काय?
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा विडा उचलला आहे. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील काही प्रमुख ठिकाणी मॉकड्रिल केली जाणार आहे. यावेळी ब्लॅकआऊट झाला, तर आयपीएल सामन्याचं काय होणार?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानची सर्वच बाजूने कोंडी केली जात आहे. आता बुधवारी संपूर्ण देशात मॉकड्रिल केलं जाणार आहे. यावेळी काही ठिकाणी रात्री ब्लॅकआऊटचा अभ्यासही केला जाणार आहे. जर असं तर आयपीएल सामन्यांवर काही परिणाम होईल का? कारण 7 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. जर या सामन्यादरम्यान ब्लॅकआऊट झालं तर सामना पूर्ण कसा होणार? या सामन्यावर काही संकट आहे का? असे एक ना अनेक प्रश्न पडले असतील. चला या सर्वांची उत्तरं जाणून घेऊयात
KKR Vs CSK सामन्यावर ब्लॅकआऊटचं संकट नाही?
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने बुधवारी होणाऱ्य मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊटसाठी काही ठिकाणं निश्चित केली आहेत. पण या यादीत पश्चिम बंगालमधील कोलकात्याचं नाव नाही. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता सोडून इतर ठिकाण यात आहेत. त्यामुळे कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये होणाऱ्या सामन्यावर कोणताच परिणाम होणार नाही. जर ब्लॅकआऊटमध्ये कोलकात्याचं नाव असतं तरी काही फरक पडला नसता. कारण कोलकात्याच्या ईडन गार्डनवर राज्याकडून वीज घेतली जात नाही. ईडन गार्डन्सवर जनरेटर्सचा वापर केला जातो. डे नाईट सामन्यात याचा वापर होतो. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, आयपीएल सामन्यादरम्यान क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ईडन गार्डनसाठी भाड्याने जनरेटर घेतं. चार लाईट टॉवर्सवर 484 लाईट आहेत.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी करो या मरोची स्थिती
आयपीएल 2025 स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्सचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे आता फक्त औपचारिक सामने खेळत आहे. पण कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. कोलकात्याने 11 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तर सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे 11 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. कोलकात्याने उर्वरित तिन्ही सामने जिंकले तर 17 गुण होतील आणि प्लेऑफमधील स्थान पक्कं होणार आहे. पण तीन पैकी एका सामन्यात पराभव झाला तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
