
इम्पॅक्ट प्लेअर देवदत्त पडीक्कल आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या जोडीने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 19 व्या मोसमात विजयी सलामी दिली आहे. आरसीबीने सनरायजर्स हैदराबादवर 6 विकेट्सने अप्रतिम असा विजय साकारला. कॅप्टन इशान किशन याच्या 80 धावांच्या जोरावर हैदराबादने आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 26 बॉलआधी 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. आरसीबीने 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 203 रन्स केल्या. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने ही कामगिरी केली. तर इशान किशन कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात हैदराबादला विजयी करण्यात अपयशी ठरला.
एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 2008 नंतर पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आरसीबीने या विजयासह खास कामगिरी करुन दाखवली. आरसीबीने मोसमातील पहिल्याच दिवशी 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारी पहिलीच टीम ठरली.
आरसीबीने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादसाठी कॅप्टन इशान किशन,हेन्रिक क्लासेन आणि अनिकेत वर्मा या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. इशानने 80, क्लासेनने 31 तर अनिकेतने 43 धावांचं योगदान दिलं. हैदराबादने अशाप्रकारे 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. जेकब डफी आणि रोमरियो शेफर्ड या दोघांनी आरसीबीसाठी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या.
त्यानंतर विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार आणि टीम डेव्हिड या चौघांनी आरसीबीच्या विजयात बॅटिंगने योगदान दिलं. मात्र विराट आणि देवदत्त हे दोघे आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. फिल सॉल्ट 8 धावांवर बाद झाले. त्यानंतर विराट आण देवदत्त या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची शतकी भागीदारी केली. देवदत्तने 61 रन्स केल्या. त्यानंतर रजत पाटीदार आणि विराट कोहली या दोघांनी 22 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली.
रजतने 12 बॉलमध्ये 31 रन्स केल्या. रजतने या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोर लगावले. रजतनंतर जितेश शर्मा आला तसाच परत गेला. त्यानंतर टीम डेव्हिड आणि विराट या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 19 बॉलमध्ये नॉट आऊट 40 रन्सची पार्टनरशीप केली आणि आरसीबीला विजयी केलं. विराटने नाबाद 69 रन्स केल्या. तर टीमने 16 रन्सची खेळी केली. हैदराबादसाठी डेव्हिड पेन याने दोघांना आऊट केलं. तर जयदेव उनाडकट आणि हर्ष दुबे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.