कृणाल पांड्या पाच वर्षांनी टीम इंडियात करणार पुनरागमन? या खेळाडूचा बळी जाणार! असं असू शकतं गणित
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेत कृणाल पांड्याला नशिबाची साथ मिळू शकते. पण एका खेळाडूचा यासाठी बळी जाण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या मालिकेसाठी कसं गणित असू शकतं ते...

आयपीएल स्पर्धेत कृणाल पांड्याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आरसीबीच्या जेतेपदात त्याचा मोलाचा वाटा राहिला आहे. पण गेल्या काही वर्षात त्याची जागा काही टीम इंडियात होत नव्हती. पण त्याच्या नावाचा विचार केला जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. डावखुरा अष्टपैलू कृणाल पांड्या गेल्या पाच वर्षापासून टीम इंडिया बाहेर आहे. त्याने शेवटचा टी20 सामना 2021 मध्ये खेळला होता. तेव्हा त्याने श्रीलंकेविरुद्ध 5 चेंडूत 3 धावा केल्या होत्या. तसेच 2 षटकात 16 धावा देऊन 1 विकेट घेतली होती. पण या सामन्यात भारताचा 38 धावांनी पराभव झाला होता. या सामन्यानंतर त्याला भारतीय संघात काही स्थान मिळालं नाही. आता त्याच्या नावाचा विचार केला जात आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळू शकतो.
कृणाल पांड्या टीम इंडियात कोणाची जागा घेणार?
कृणाल पांड्याला संघात स्थान दिलं जाईल, याची चर्चा क्रीडावर्तुळात जोरदार रंगला आहे. पण संघात कोणाची जागा खाणार हे देखील महत्त्वाचं आहे. कारण कृणाल पांड्याला संघात घ्यायचं तर कोणाला बसवायचा असा प्रश्न आहे. अक्षर पटेलच्या जागी त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात फेल गेला होता. त्याचा या दोन्ही मालिकेतील सर्वोत्तम स्कोअर हा 15 धावा होता. ही धावसंख्या त्याने आयर्लंडविरुद्ध ठोकली होती. तसेच फक्त 4 विकेट काढण्यात यश आलं होतं. त्यामुळे त्याच्या जागी आता कृणाल पांड्याचा विचार केला जात आहे.
कृणाल पांड्याचा विचार करण्याचं कारण काय?
कृणाल पांड्याने आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला होता. त्याच्या कामगिरीमुळे आरसीबीने दुसऱ्यांदा जेतेपद मिळवलं होतं. या स्पर्धेत त्याच्या अष्टपैलू कामगिरीचं कौतुक झालं होतं. त्याने 37.66 च्या सरासरीने 226 धावा केल्या होत्या. तसेच 14 विकेटही काढल्या होत्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 8.41 प्रति षटक राहिला. इतकंच काय तर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यात सक्षम आहे. त्यामुळे त्याच्याकडे निवड समितीचं लक्ष लागून आहे.
