IPL 2026 : 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईचा सलग चौथा पराभव, पलटणच्या स्थितीला चौघे सर्वाधिक जबाबदार
Mumbai Indians ipl 2026 : मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्स विरुद्ध आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा हा सलग आणि एकूण चौथा पराभव ठरला.

मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सकडून 16 एप्रिलला 7 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. पंजाबने मुंबई विरुद्ध 196 धावांचं आव्हान हे 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. कॅप्टन श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन या दोघांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये सहज आणि सोपा विजय मिळवला. पंजाबचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. यासह पंजाब किंग्स वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. पंजाबचा 16 एप्रिल रोजीचा वानखेडेतील मुंबई विरुद्धचा एकूण सहावा विजय ठरला. तसेच मुंबईचा 19 व्या मोसमातील एकूण चौथा पराभव ठरला. मुंबईच्या या स्थितीला कोणते 4 खेळाडू हे जबाबदार आहेत? याबाबत जाणून घेऊयात.
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह मुंबईचा प्रमुख आणि सध्याचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. बुमराहने मुंबईला आतापर्यंत अनेक सामन्यांत एकहाती विजय मिळवून दिला आहे. बुमराहने अनेकदा अशक्य वाटणाऱ्या सामन्यात विजयी केलं आहे. मात्र बुमहारची सलग आणि एकूण 5 विजयानंतरही विकेटची पाटी कोरीच आहे. त्यामुळे बुमराहचा तो दबदबा नाहीसा झालाय की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
बुमराहने या मोसमात आतापर्यंत एकूण 5 सामन्यांमध्ये 164 धावा लुटवल्या आहेत. मात्र बुमराहला एकही विकेट मिळवता आलेली नाही. बुमराहचा या मोसमातील इकॉनमी रेट हा 8.63 असा आहे. बुमराहची ही कामगिरी मुंबईच्या अपयशासाठी कुठेतरी कारणीभूत आहे.
सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादव टी 20I टीम इंडियाचा कॅप्टन आहे. सूर्याचा टीम इंडियाप्रमाणे मुंबई इंडियन्सकडून खेळतानाही धावांसाठीचा संघर्ष सुरुच आहे. सूर्याने आतापर्यंत एकूण 5 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह एकूण 106 रन्स केल्या आहेत. बुमराहच्या या एका अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला धावांसाठी झगडावं लागत आहे.
तिलक वर्मा
तिलक वर्मा याची सूर्यकुमार यादव याच्यापेक्षा वाईट स्थिती आहे. तिलकला या मोसमात 5 पैकी 2 डावांत दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. तिलक एका सामन्यात झिरोवर आऊट झालाय. तिलकने या 5 सामन्यांमध्ये एकूण 43 धावा केल्या आहे.
हार्दिक पंड्या
मुंबईच्या या स्थितीला प्रमुख म्हणून हार्दिक पंड्या सर्वाधिक जबाबदार आहे. हार्दिकला नेतृत्वासह फलंदाजी आणि गोलंदाजीनेही काही खास करता आलेलं नाही. हार्दिकने 4 सामन्यांत 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 81 रन्स केल्या आहेत. त्यामुळे मुंबईला कमबॅक करायचं असेल तर कॅप्टन आणि हार्दिकसह वरील तिघांना दमदार कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही.