World Cup 2023 : वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाला फायदा कमी तोटाच जास्त, आयसीसीच्या निर्णयामुळे चाहते नाराज
One Day World Cup 2023: वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पण आयसीसीच्या एका निर्णयाने टीम इंडियाला मोठा फटका बसणार आहे. घरच्या मैदानांचा आता हवा तसा फायदा होणार नाही.

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या वनडे वर्ल्डकपसाठी दहा संघ तयारी करत आहेत. स्पर्धा भारतात असल्याने त्याचा फायदा टीम इंडियाला होईल असं अनेक क्रिकेटपटूंचं म्हणणं आहे. पण आयसीसीच्या खेळपट्टीबाबतच्या निर्णयाने सर्व चित्रच बदलून गेलं आहे. घरच्या खेळपट्ट्यांचा टीम इंडियाला फायदा घेता येणार नाही. वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. भारतासह दहा संघ जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
द टेलिग्राफमध्ये आलेल्या बातमीत असं सांगण्यात आलं आहे की, ’23 ऑगस्टला आयसीसीची एक मीटिंग पार पडली यात आयसीसीचे चीफ क्यूरेटर अँडी एटकिंसन यांनी सर्व क्यूरेटर्संना सूचना दिल्या आहेत की, सराव सामना असो की मुख्य सामना..खेळपट्ट्या तयार करताना होम टीमच्या दबावात येऊ नका. स्पोर्टी विकेट तयार करण्यावर जोर द्या. होम ग्राऊंडचा फायदा टीमला होईल असं काही करू नका.’
प्रत्येक ठिकाणी असेल वेगळी खेळपट्टी
टेलिग्राफच्या बातमीनुसार, भारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माती आहे. त्याचा परिणाम खेळपट्ट्यांवर दिसून येतो. प्रत्येक ठिकाणी एक सारखी खेळपट्टी बनवणं कठीण आहे. म्हणजेचं प्रत्येक ठिकाणची खेळपट्टी वेगवेगळी असेल.पण खेळपट्टी चांगल्या दर्जाच्या बनवल्या जाव्यात यावर जोर देण्यात आला. या खेळपट्ट्यांवर 50 षटकांचा सामना पूर्णपणे खेळला जाऊ शकेल.
या दहा मैदानांवर होणार वर्ल्डकप स्पर्धा
गुजरातचं नरेंद्र मोदी स्टेडियम, कोलकात्याचं ईडन गार्डन्स स्टेडियम, हैदराबादचं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, लखनऊचं इकाना क्रिकेट स्टेडियम, चेन्नई एम चिदंबरम स्टेडियम, चेन्नई एम चिन्नस्वामी स्टेडियम, दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम, धर्मशाळा, मुंबईचं वानखेडे स्टेडियम आणि पुण्याच्या एम.सी.ए. स्टेडियम या दहा मैदानात सामने होणार आहेत.
5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धा
वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी 8 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यात भारताची बाजू भक्कम मानली जात होती. पण आता आयसीसीच्या निर्णयामुळे टीम इंडियाला खेळपट्ट्यांचा फायदा घेता येणार नाही.
