टीम इंडियासाठी खेळतो..! इशान किशनच्या शिटीवाल्या सेलिब्रेशनवर आर अश्विनने म्हणणं मांडलं
आयपीएल 2026 स्पर्धेतील 63व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केलं. या विजयासह हैदराबादने प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं. या विजयात इशान किशनने 70 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. पण सामन्यानंतर त्याचं सेलीब्रेशन सर्वाधिक चर्चेत राहिलं.

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. चेपॉकवरील या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयासह प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. या विजयात सनरायझर्स हैदराबादकडून इशान किशनची खेळी महत्त्वाची ठरली. त्याने 70 धावा ठोकत चेन्नईच्या हातातून सामना खेचून आणला. या विजयानंतर इशान किशनला भावना उफाळून आल्या. त्याने मैदानात चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना पाहून शिटी मारली. त्याचं हे सेलीब्रेशन चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना आवडलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या विरोधात रान उठलं आहे. असं असताना आर अश्विनने त्याच्या सेलिब्रेशनचं समर्थन केलं आहे. आर अश्विनने सोशल मीडियावरील ऐश की बात या कार्यक्रमात सांगितलं की, चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना अहंकार बाळगू नये. तसेच सेलीब्रेशन वैयक्तिक घेऊ नये. त्याच्या मते अशा काही घटनांमुळे खेळाची मजा आणखी वाढते.
आर अश्विन म्हणाला की, ” सामन्यानंतर इशान किशनच्या सेलिब्रेशनबद्दल बरीच चर्चा होत आहे . अरे, त्याकडे दुर्लक्ष करा. हे सर्व खेळाडू आहेत, भावना हा खेळाचाच एक भाग आहे. हे वैयक्तिकरित्या घेऊ नये; त्याचा आनंद घेतला पाहिजे. हा खेळाडू भारतीय संघाकडून खेळतो. जर एखादा खेळाडू तुमच्या घरी येऊन सेलिब्रेशन करत असेल, तर त्यात अहंकार का आणायचा? त्याचा आनंद घ्या. कदाचित पुढच्या वेळी इशान किशन आपल्या भावनांवर थोडे नियंत्रण ठेवेल. हो, हे टाळता आले असते, पण मी त्याचा आनंद घेतला. पुढच्या वेळी, सनरायझर्स हैदराबादच्या घरी जा आणि त्यांना हरवून असेच सेलिब्रेशन करा; हा खेळाचाच एक भाग आहे.”
As always, @ashwinravi99 has the most balanced and sensible take on the #IshanKishan whistle. 👏🏻😊
Good to see a #CSK legend take it in the absolute right spirit 🙏🏻😊 pic.twitter.com/ZthzuCH4sU
— Meher Kilaru (@Kilaruness) May 19, 2026
इशान किशन म्हणाला की, ‘मला वाटतं, जेव्हा मी यष्टीरक्षण करत होतो, तेव्हा मला जाणवलं की ही खेळपट्टी सोपी नाही. मला अजूनही वाटत होतं की या धावसंख्येचा पाठलाग करणं थोडं जास्तच होईल, कारण खेळपट्टी अजिबात सोपी नव्हती, विशेषतः जेव्हा फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत होते आणि त्यांचे संथ चेंडू खूप चांगले काम करत होते. पण त्याच वेळी, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून मला वाटलं की, माझं काम फक्त सामना संपवण्याचा प्रयत्न करणं आहे, कारण डावाच्या उत्तरार्धात येणाऱ्या फलंदाजांना एकेरी धावा घेणं आणि त्याच वेळी चौकार मारणं कठीण जातं. त्यामुळे मला शेवटच्या षटकापर्यंत खेळायचं होतं. ‘