अजिंक्य रहाणेचं नशिब म्हणावं की आणखी काय? चौकारच होता पण…, पाहा Video
रणजी स्पर्धेत सर्वाधिक दिग्गज खेळाडूंचा भरणा मुंबईच्या संघात आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रोहित शर्मा, जयस्वाल, दुबे आणि शार्दुल ठाकुरसारखे दिग्गज खेळाडू आहेत. असं असताना टीमला वाईट स्थितीतून काढण्यात अजिंक्य रहाणेला अपयश आलं. दुसरीकडे लॉर्ड शार्दुलने शतकी खेळी करत लाज राखली.

अजिंक्य रहाणे हे भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये नशिब आजमावत आहे. मात्र त्यातही त्याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. इतकंच काय तर त्याला नशिबाची साथ मिळत नाही असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबई संघाची 86 वर 5 विकेट अशी स्थिती होती. पहिल्या डावात जम्मू काश्मीरने घेतलेली आघाडी मोडून काढली होती. पण पुढे मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. अशा स्थितीत कर्णधार अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा होत्या. त्याने यासाठी कंबरही कसली होती. अजिंक्य रहाणने नाबाद 16 धावांवर खेळत होता. उमर नझीरच्या गोलंदाजीचा सामना करत होता. उमरने ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथ चेंडू टाकला. रहाणेने मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून जबरदस्त फटका मारला. जवळपास हा चेंडू चौकार होता असंच म्हणावं लागेल. पण येथे अजिंक्य रहाणेचं नशिब आडवं आलं.
मिड ऑफ उभ्या असलेल्या डोगराने डाव्या बाजूला धावला आणि उडी घेतली. तसेच डाव्या हातात अजिंक्य रहाणेचा अप्रतिम झेल पकडला. डोगराने चौकार तर वाचवला वरून अजिंक्य रहाणेला तंबूत जाण्यास भाग पाडलं. त्यामुळे मुंबईला 91 धावांवर 6 विकेट अशी स्थिती आली. त्यानंतर शम्स मुलानीही काही खास करू शकला नाही आणि 4 धावा करून बाद झाला. त्यामुळे 101 धावांवर 7 विकेट अशी स्थिती आली.
What. A. Catch 😮
J & K captain Paras Dogra pulls off a sensational one-handed catch to dismiss Mumbai captain Ajinkya Rahane 🔥#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/oYXDhqotjO pic.twitter.com/vAwP5vY28P
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 24, 2025
मुंबईची लाज वाचवण्यात आठव्या आणि नवव्या स्थानावर खेळत असलेल्या खेळाडूंना यश आलं. दोघांनी दुसऱ्या दिवशी 150 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसेच मुंबईला संकटातून बाहेर काढलं. शार्दुल ठाकुरने शतक, तर तनुष कोटियनने अर्धशतक ठोकलं. मुंबईचा संघ पहिल्या डावात 120 धावांवर बाद झाला होता. तर जम्मू काश्मीरने पहिल्या डावात 206 धावा करत 86 धावांची आघाडी घेतली होती. 2014 मध्ये जम्मू काश्मीरने मुंबईला पराभूत केलं होतं.
