T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाच्या 12 जणांची नावं निश्चित!
Icc T20i World Cup Team India : रोहित शर्मा टीम इंडियाचं आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व सांभाळणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा असणार आहे.

टीम इंडियाचे बहुंताश खेळाडू हे सध्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात विविध 10 संघांकडून खेळत आहेत. आयपीएल स्पर्धा 26 मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. त्यानुसार एकूण 20 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. टी 20 वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन हे अमेरिका आणि विंडिजमध्ये संयुक्तरित्या करण्यात आलं आहे. आयसीसीच्या सूचनेनुसार, 1 मे पर्यंत सर्व क्रिकेट बोर्डांना टीमची घोषणा करायची आहेत. त्याआधी सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीवर खेळाडूंचं वर्ल्ड कपचं तिकीट कन्फर्म होणार आहे. तर काही खेळाडूंची निवड होणार असल्याचं हे निश्चितच आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडून 15 पैकी 12 जणांची नावं कन्फर्म आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र उर्वरित 3 जागांसाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. या 3 जागांसाठी कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची,हे आयपीएलमधील कामगिरीवरुन निश्चित केलं जाईल. कारण, वर्ल्ड कपआधी आयपीएल सर्वात मोठी स्पर्धा पार पडतेय.
टीमची घोषणा केव्हा?
नियमानुसार, स्पर्धेच्या 1 महिन्याआधी टीमची घोषणा करावी लागते. आता वर्ल्ड कपला 1 जूनपासून सुरुवात होणार असल्याने 1 मेपर्यंत सर्व संघांना नावं जाहीर करावी लागणार आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाची घोषणा एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यात कधीही होऊ शकते. अशात 15 पैकी 12 जवळपास निश्चित असलेल्या खेळाडूंची नावं आपण जाणून घेऊयात.
रोहित शर्मा कॅप्टन
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित हे पहिलं नाव निश्चित आहेत. तसेच हार्दिक पंड्या उपकर्णधार असणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही दिवसांपूर्वी ही नावं निश्चित केली होती. यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या दोघांपैकी एक राखीव ओपनर असू शकतो. विराट कोहलीचं नावंही निश्चित मानलं जात आहे.
मधल्या फळीतील फलंदाजीचा अनुभव आणि विकेटकीपिंग अशा दोन्ही बाबींमुळे केएल राहुल याला संधी मिळू शकते. सूर्यकुमार यादव याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. सूर्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून दुखापतीमुळे क्रिकेट खेळलेला नाही. मात्र सूर्या जूनपर्यंत निश्चित दुखापतीतून फिट झालेला असेल. अशात सूर्याचं नावं या 12 जणांमध्ये असेल. फिनीशर म्हणून रिंकू सिंहला संधी मिळू शकते. तसेच ऑलराउंडर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाचे आधारस्तंभ आहेत.
आता उर्वरित 3 जागांसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड कपसाठी 3 खेळाडूंची निवड आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून असेल. वर्ल्ड कपमधील 3 जागांसाठी 8 खेळाडूंमध्ये रस्सीखेच आहे. हे 8 खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. अशात निवड समितीसमोर 3 जांगासाठी कुणाची निवड करायची, हे सर्वात आव्हानात्मक असणार आहे.
ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज या 8 पैकी कोणत्या तिघांचा समावेश करायचा? यात निवड समितीच्या निवडीचा कस लागणार आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 12 खेळाडूंची संभावित नावं : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), रिंकू सिंह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह.
