RR vs RCB : वरुणराजाने चालवलंय काय? टॉसआधी पावसाचं विघ्न, सामना रद्द होणार?
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Rain : राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याआधीच पावसाच्या विघ्नामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यामुळे चाहत्यांना आता पुढील अपडेटची प्रतिक्षा आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पावसाने काय लावलंय? असा संतापजनक प्रश्न विचारण्याची वेळ क्रिकेट चाहत्यांवर आली आहे. पावसाने आधीच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना वाया घालवलाय. पावसामुळे केकेआर विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना नाईलाजाने प्रत्येकी 1-1 गुणावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर पावसाने राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यातील 9 ओव्हर वाया घालवल्या. त्यामुळे उभयसंघात फक्त 11 षटकांचाच सामना होऊ शकला.
पावसामुळे सलग 2 सामने प्रभावित झाले. त्यानंतरही पावसाने आपला तडाखा कायम ठेवला आहे. स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. सामन्याला संध्याकाळी नियमांनुसार साडे सात वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार होता. मात्र पावसाच्या विघ्नामुळे सामन्याचं वेळापत्रक कोळमडलं आहे. पावसामुळे नाणेफेकीला विलंब झाला आहे. त्यामुळे चाहत्यांची मानसिक चिडचिड झाली आहे. तसेच सोशल मीडियावरही बीसीसीआय आणि आयपीएलवर मॅनेजमेंटवरुन सडकून टीका केली जात आहे.
गुवाहाटीत पावसाची जोरदार बॅटिंग
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र टॉसआधीच पावसाने टॉप गिअरमध्ये बॅटिंग सुरु केली. त्यामुळे परिस्थिती पाहता टॉस आणि सामना वेळेत होणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. अखेर हा अंदाज खरा ठरला. पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने मैदानात आसपास पाणी साचलंय.
पाऊस थांबला, आता सामना होणार
🚨 Update from Guwahati 🚨
The rain has stopped and we have a full game on our hands! 🤩
Toss ⏰ 8:00 PM Start of Play ⏰ 8:15 PM
A full 20-overs-a-side blockbuster awaits! 🔥#TATAIPL | #KhelBindaas | #RRvRCB pic.twitter.com/3FFuVHoLiC
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2026
आधी बरसला-मग थांबला
दरम्यान पावसाने काही मिनिटं बॅटिंग केल्यानंतर अखेर विश्रांती घेतली. त्यामुळे ग्राउंड स्टाफला मैदान कोरडं करण्यासाठी अपेक्षित वेळ मिळाला. ग्राउंड स्टाफने कठोर मेहनत घेऊन मैदान कोरडं केलं. त्यानंतर पंचांनी मैदानाची पाहणी करुन दोन्ही संघांना आणि तमाम क्रिकेट चाहत्यांना दिलासादायक अपडेट दिली. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार आता सामना होणार आहे. रात्री 8 वाजता टॉस होणार आहे. तर 15 मिनिटांनतर अर्थात सव्वा आठ वाजता पहिला बॉल टाकला जाणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
