SAW vs INDW : टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, चौथ्या सामन्यात विजयाचं खातं उघडणार?
South Africa Women vs India Women 4th T20I : वुमन्स टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आता लाजेखातर टीम इंडिया उर्वरित 2 सामने जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडियाची महिला ब्रिगेड दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आतापर्यंत सपशेल अपयशी ठरली आहे. टीम इंडियाने सलग 3 सामन्यांसह टी 20i मालिका गमावली आहे. उभयसंघात एकूण 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 0-3 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे चौथा सामना टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा आहे. दक्षिण आफ्रिकेने सलग 3 सामन्यांसह मालिका आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियासाठी उर्वरित 2 सामने फार प्रतिष्ठेचे आहेत. त्यामुळे टीम इंडियासमोर 2 सामने जिंकून लाज राखण्याचं आव्हान आहे. उभयसंघातील चौथा सामना हा शनिवारी 25 एप्रिलला होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात तरी जिंकणार की दक्षिण आफ्रिका विजयी चौकार लगावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील चौथ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना कधी?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना शनिवारी 25 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना कुठे?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना जोहान्सबर्गमधील वँडरर्स स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया चौथा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईलवरुन लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.
टीम इंडियाच्या कामगिरीमुळे टेन्शन
आगामी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालंय. या स्पर्धेला आता मोजून 50 दिवसांपेक्षा कमी अवधी शिल्लक आहे. त्यात आयसीसी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाच्या अशा निराशाजनक कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंट आणि चाहत्यांना टेन्शन आलं आहे.
पहिल्या 3 सामन्यांत काय झालं?
दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांत विजयी धावांचा पाठलाग करुन सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने तिन्ही सामने मोठ्या आणि चांगल्या फरकाने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट्सने सामना जिंकून मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानंतर यजमानांनी दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्सन विजय मिळवत मालिकेत आघाडी मजबूत केली. तर तिसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने भारतावर मात करत मालिका नावावर केली. आता टीम इंडियाची महिला ब्रिगेड चौथ्या क्रिकेट सामन्यात पलटवार करते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.