Michael vaughan ने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं, अत्यंत झोंबणारे शब्द वापरले
मायकल वॉनने मान्य केलं, टीम इंडियाकडे टॅलेंटेड खेळाडू आहेत, पण....
लंडन: टीम इंडिया T20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. काल सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारतावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाच्या या खराब कामगिरीवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने अत्यंत बोचरी टीका केली आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेट इतिहासातील ही सर्वात खराब टीम असल्याची टीका मायकल वॉनने केली आहे.
T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया जुन्या शैलीच क्रिकेट खेळली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 168 धावा केल्या. इंग्लंडने हे लक्ष्य 16 व्या ओव्हरमध्येच पार केलं.
2011 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर काय केलं?
“इंडियन प्रीमियर लीग खेळायला जाणारा प्रत्येक खेळाडू त्याच्या खेळात किती सुधारणा झालीय ते सांगतो. पण भारताने त्यातून काय मिळवलं?” असा प्रश्न वॉन यांनी विचारला आहे. “2011 मध्ये आपल्याच घरात त्यांनी वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर त्यांनी काय केलं? काहीच नाही. टीम इंडिया व्हाइट बॉलमध्ये अजूनही जुन्या शैलीच क्रिकेट खेळतेय. जसं क्रिकेट ते अनेक वर्षांपासून खेळत आलेत” असं मायकल वॉन यांनी आपल्या टेलिग्राममधील आपल्या लेखात म्हटलय.
पंतचा योग्य उपयोग केला नाही
वॉनने भारतीय टीम मॅनेजमेंटवरही टीकेचे आसूड ओढले आहेत. टीम इंडियाने ऋषभ पंतचा योग्य उपयोग केला नाही. टीम इंडियाकडे टॅलेंटेड खेळाडू आहेत. पण त्यांना खेळवण्याची योग्य प्रक्रिया नाहीय, या बद्दल वॉनने आश्चर्य व्यक्त केलं.
ऑलराऊंडर्सची कमतरता
भारताकडे पाच गोलंदाजांचाच पर्याय कसा असू शकतो? 10-15 वर्षापूर्वी सर्वच फलंदाज थोडीफार गोलंदाजी करायचे. सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांचे दाखले वॉनने आपल्या लेखात दिले आहेत. कुठलाही फलंदाज गोलंदाजी करत नाही, म्हणून कॅप्टनकडे पाचच गोलंदाजाचा पर्याय होता, असं वॉनने म्हटलय.
लेग स्पिनर कुठे आहेत?
लेग स्पिनर युजवेंद्र चहलला न खेळवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “टी 20 क्रिकेटचे आकडे आपल्या सर्वांना माहित आहेत. टीमला अशा एका स्पिनरची गरज होती, जो दोन्ही बाजूंनी टर्न करु शकेल. भारताकडे अनेक लेग स्पिनर आहेत, पण ते आहेत कुठे?” असा सवाल वॉर्नने उपस्थित केला.