
माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या काळात भारतीय क्रिकेटने सुवर्णकाळ अनुभवला. भारतीय संघाची खऱ्या अर्थाने या काळात पायाभरणी झाली. या काळातच भारतीय संघ आक्रमकपणे खेळण्यास शिकला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे सौरव गांगुलीने एखाद्या कार्यक्रमात हजेरी लावली तर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. टीव्ही 9 चा खास कार्यक्रम असलेल्या सत्ता संमेलन कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने हजेरी लावली. यामुळे या कार्यक्रमात काही तरी नवीन किस्से ऐकायला मिळणार याची कल्पना क्रीडाप्रेमी आणि प्रेक्षकांना होती. सौरव गांगुलीने चाहत्यांना निराश देखील केलं नाही. सौरव गांगुलीने प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिलखुलासपणे दिली. या दरम्यान, सौरव गांगुलीने एक मजेशीर किस्सा सांगितला. सौरव गांगुलीने आईबाबत हा खुलासा केला. गळ्यात इतक्या साऱ्या माळा घालण्याचं कारण काय? याबाबत सौरव गांगुलीने सांगितलं.
सौरव गांगुलीने लॉर्ड मैदानात सामना जिंकल्यानंतर टीशर्ट काढल्याचं प्रत्येकाला आठवतं. त्यावेळेस त्याच्या गळ्यात भरपूर साऱ्या माळा दिसल्या होत्या. गळ्यात इतक्या साऱ्या माळा घालण्याचं कारण काय? याबाबत त्याने आता कुठे खुलासा केला. सौरव गांगुलीने सत्ता संमेलन कार्यक्रमात सांगितलं की, ‘या माळा मला माझ्या आईने घातल्या आहेत. यामुळे मला देवाचा आशीर्वाद मिळतो. मी जेव्हा खेळायला जायचो, तेव्हा माझी आई माझ्याकडून सहा दिवसांपूर्वी चैन काढून घ्यायची. पुन्हा जाण्यापूर्वी सकाळी गळ्यात चैन घालायची. मी पाहायचो की त्यात एक नवीन खडा वगैरे असायचा. मी तिला विचारलं की माझे इतके सारे ग्रह खराब आहेत का? तेव्हा आई सांगायची गप्पपणे घाल, खेळायला जा आणि प्रश्न विचारू नको.’
वर्ष 2000 साली मॅच फिक्सिंग भूत क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं होतं. त्या काळात सौरव गांगुलीच्या हातात क्रिकेटची संघाची धुरा आली होती. संकटाच्या काळात त्याने टीम इंडियाचं नेतृत्व प्रभावीपणे केलं. इतकंच काय तर त्याच्या कारकिर्दीत 20 वर्षांनी म्हणजेच 2003 मध्ये भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. सौरव गांगुली हा यशस्वी कसोटी कर्णधारही ठरला आहे. त्याने टीम इंडियासाठी 113 कसोटी सामने खेळले आणि 7212 धावा केल्या. यात 16 शतकांचा समावेश आहे. 49 कसोटी सामन्यात संघाचं नेतृत्व केलं आणि 21 सामन्यात विजय मिळवून दिला. 311 वनडे सामन्यात 11363 धावा केल्या आणि 22 शतकं ठोकली.
सौरव गांगुलीने 2013 क्रिकेटला रामराम ठोकला आणि 2015 पासून क्रिकेट व्यवस्थापनाचं काम सुरू केलं. बंगाल क्रिकेट एसोसिएशनमध्ये सचिव म्हणून भूमिका बजावली. 2019 मध्ये बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलं. त्याने तीन वर्षे हा कार्यभार सांभाळला. त्यानंतर 2025 मध्ये पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी विराजमान झाले.