IPL 2026: तीन सामन्यात तीन वाद..! सनरायझर्स हैदराबादचा संताप, बीसीसीआयकडे करणार तक्रार
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद हा संघ सर्वात घातक दिसत आहे. पण सुरूवात काही चांगली झाली नाही. आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला. असं असताना सनरायझर्स हैदराबादचा संघ वादग्रस्त निर्णयामुळे संतापला आहे. चला जाणून घेऊयात काय ते..

आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात आक्रमक आणि घातक फलंदाज जर कोणत्या संघात असतील तर ते सनरायझर्स हैदराबाद संघात.. सलामीला ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा.. त्यानंतर इशान किशन आणि हेनरिक क्लासेन.. अशी दिग्गज फलंदाजांची फळी आहे. तरीही सनरायझर्स हैदराबादची या स्पर्धेतील सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिला सामना आरसीबीविरुद्ध झाला आणि पहिल्याच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. पण तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या तीन सामन्यात जय पराजय होत असताना तीन वादही चर्चेत राहिले. पंचांच्या काही वादग्रस्त निर्णयाचा फटका सनरायझर्स हैदराबादला बसला. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, सनरायझर्स हैदराबाद या निर्णयामुळे खूपच नाराज आहे. या प्रकरणाची आता बीसीसीआयकडे तक्रार करण्याची तयारी केली आहे.
क्लासेनचा झेल आणि निर्णय
आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वादाची किनार लाभली. आरसीबीविरूद्धच्या सामन्यात हेनरिक क्लासेनच्या विकेटवरून वाद झाला. या सामन्यात हेनरिक क्लासेन जोरदार फटकेबाजी करत होता. धावगती वेगाने वाढत असताना एक फटका मारला आणि फिल सॉल्टने बाउंड्रीवर अप्रतिम झेल पकडला. पण रिप्ले पाहिल्यानंतर त्याचा पाय हलका बाउंड्री कुशनला लागल्याचं दिसत होतं. पण पंचांनी त्याला बाद दिलं.
अभिषेक शर्माचा झेल
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना सनरायझर्स हैदराबादने जिंकला. पण या सामन्यात अभिषेक शर्माचा झेल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वरूण चक्रवर्तीने त्याचा झेल पकडला. पण झेल हातात येण्यापूर्वीच जमीन घासल्याचं दिसत होतं. अशा झेलवरून कायम वाद होत असतो आणि झालंही तसंच.. अभिषेक शर्माने या झेलवरून नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्याला दंड ठोठावला गेला.
लखनौविरुद्धचा विजयी चौकार
लखनौ विरुद्धचा सामना अतितटीचा झाला. शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. पण त्यानंतर 2 चेंडूत 1 धाव अशी स्थिती आली. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पंतने चौकार मारला. पण चेंडू सीमा पार होण्यापूर्वी आवेश खानने उत्साहात बॅटने चेंडूवर प्रहार केला. त्यावेळेस कोणाचंच लक्ष गेलं नाही. त्यानंतर सोशल मीडियावर रान उठलं. अनफेयर प्ले नियमांतर्गत खरं तर लखनौवर पाच धावांची पेनल्टी लागायला हवी होती. पण तसं झालं नाही.
