
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामने दोन गटात सुरू आहे. दोन गटातील टॉप दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे या फेरीत चुरस वाढली आहे. गट 1 मध्ये भारत, दक्षिण अफ्रिका, झिम्ब्वाब्वे आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. या चार संघात टॉप 2 मध्ये राहण्याची चढाओढ असणार आहे. प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी चुरशीची लढाई असणार आहे, यात काही शंका नाही. भारताचा पहिला सामना दक्षिण अफ्रिकेशी झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी लोळवलं. त्यामुळे भारताच्या नेट रनरेटची पुरती वाट लागली आहे. भारताचा नेट रनरेट हा -3.800 असा आहे. त्यामुळे या नेट रनरेटमध्ये सुधारणा करायची असेल तर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत करणं भाग आहे. नाही तर उपांत्य फेरीचं गणित बिघडू शकतं. खरं तर भारताचा उपांत्य फेरीचा सोपा मार्ग हा दक्षिण अफ्रिकेच्या हाती आहे. कसं काय ते समजून घ्या.
दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर आता उर्वरित दोन सामने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजशी होणार आहे. या दोन सामन्यावर भारताचं उपांत्य फेरीचं गणित ठरणार आहे. भारताची उपांत्य फेरीची वाट सहज सोपी व्हावी असं वाटत असेल, तर दक्षिण अफ्रिकेने दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण दक्षिण अफ्रिकेने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला. तर भारताचं नेट रनरेटचं गणित काही राहणार नाही. मग भारताला फक्त झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत करावं लागणार आहे. हा भारताच्या उपांत्य फेरीसाठी सोपा मार्ग राहील. दक्षिण अफ्रिकेने एकही सामना गमावला तर मात्र सर्व काही नेट रनरेटवर येईल.
सुपर 8 फेरीत चार पैकी 3 संघ 2 सामने जिंकतील अशी स्थिती येऊ शकते. त्यामुळे गुण सारखे असले की नेट रनरेट पाहिला जाईल. भारताचा 76 धावांनी पराभव झाल्याने नेट रनरेटचं चित्र खूपच खराब आहे. भारताला -3.800 नेट रनरेट धन स्थितीत आणायचा असेल. तर पुढच्या सामन्यात साधारण 80–100 धावांनी विजय मिळवावा लागेल. असं झालं तर नेट रनरेट झपाट्याने सुधारेल. दुसरं धावांचा पाठलाग करता नेट रनरेट सुधारू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर, 160 धावांचं लक्ष्य दिलं असेल तर भारताने ते 13–14 षटकात पूर्ण केलं तर नेट रनरेट सुधारेल.