टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर संजय मांजरेकरने मीठ चोळलं! दक्षिण अफ्रिकेचे आभार मानत म्हणाला…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारताचा दारूण पराभव झाला आहे. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभवाची धूळ चारली आहे. या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. यात माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी तर थेट दक्षिण अफ्रिकेचा आभार मानले आहेत. त्याचं कारण असं की...

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर उपांत्य फेरी गाठेल की नाही याबाबत शंका आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियाला पहिल्यांदाच 76 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. इतक्या मोठ्या फरकाने पराभव झाल्याने नेट रनरेटचं गणित चुकलं आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर याने टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिकेचे आभारही मानले आहेत. संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दक्षिण अफ्रिकेचे आभार व्यक्त केले आहेत. कारण त्यामुळे टीम इंडियाला मोठा धडा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच पुढे काय करायला हवं? याबाबत समजवून फुंकरही घातली आहे.
संजय मांजरेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘दक्षिण अफ्रिकेचे आभार, कारण त्यांच्यामुळे टीम इंडियाला पुढे काय करायचं ते कळलं आहे. फलंदाजांना फिरकीविरुद्ध चांगल्या तंत्रासह खेळावं लागेल. थ्रो डाउन सरावात स्लोअर चेंडूंचा जास्तीत जास्त सराव करावा लागेल. तसेच कुलदीप यादवला निश्चितच संधी दिली पाहिजे.’ टीम इंडियाच्या दारूण पराभवाला फलंदाजांची हाराकिरी समोर आली आहे. कारण भारतीय फलंदाजांनी फिरकी आणि स्लोअर चेंडूंसमोर गुडघे टेकले.
Thanks to SA we now know what Ind needs to do next. 1) Get batters with soft skills against spin to bat up the order. 2) Guy doing ‘throw downs’ to throw a a million slower balls at Ind batters.☺️ 3) Kuldeep must play to have another wicket taking option.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) February 22, 2026
इशान किशन ऑफ स्पिनर एडन मार्करमसमोर काहीच करू शकला नाही. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे टीम इंडियावर पहिल्या षटकापासून दबाव वाढला. दुसरीकडे, आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माला स्लोअर चेंडूवर फसवलं. 15 धावांवर असताना मार्को यानसेनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तिलक वर्माची स्थिती काही वेगळी नाही. त्याने फक्त 1 धाव केली. तर कर्णधार सूर्यकुमार यादव 18 धावा करून बाद झाला. भारताविरुद्ध केशव महाराजने 3, मार्को यानसेनने 4 आणि कॉर्बिन बॉशने 2 विकेट घेतल्या. या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी आणखी एक नकोसा विक्रम रचला आहे. भारताचे फलंदाज 11वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
