टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप फायनल मध्ये एकच संघ हरवेल, रिकी पाँटिंगचा दावा
यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप (Australia T 20 World cup) स्पर्धा होणार आहे. टीम इंडिया सध्या हीच वर्ल्ड कप स्पर्धा सध्या डोळ्यासमोर ठेवून तयारी करतेय.
मुंबई: यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप (Australia T 20 World cup) स्पर्धा होणार आहे. टीम इंडिया सध्या हीच वर्ल्ड कप स्पर्धा सध्या डोळ्यासमोर ठेवून तयारी करतेय. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये भारताचं साखळी (Team India) फेरीतच आव्हान संपुष्टात आलं होतं. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. त्यामुळे साखळी फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. यंदा तशी नामुष्की ओढवू नये, यासाठी बीसीसीआयने (BCCI) आधीपासूनच कंबर कसली आहे. भारतीय संघ सातत्याने टी 20 मालिका खेळतोय. हेड कोच राहुल द्रविड यांची त्या दृष्टीने संघ बांधणी सुरु आहे. आता हळूहळू हा संघ आकाराला येत असल्याचं दिसतय. भारतीय संघाने नुकतीच इंग्लंड विरुद्धची टी 20 मालिका 2-1 ने जिंकली. आता वेस्ट इंडिज मध्ये पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारतीय संघावर विश्वास
भारतीय संघ यंदाच्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार रिकी पाँटिंग यांनी, भारतीय संघ वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये दाखल होईल, असा विश्वास व्यक्त केलाय. भारत आणि गतविजेता ऑस्ट्रेलियाच संघ फायनल मध्ये पोहोचेल. पण फायनल मध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताला पराभूत करेल, असा दावा रिकी पाँटिंग यांनी केला आहे. “भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ फायनल मध्ये खेळतील. त्यात ऑस्ट्रेलियन संघ भारताला पराभूत करेल” असं पाँटिंग यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाने मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं होतं.
ऑस्ट्रेलिया का वर्ल्ड कप जिंकेल?
रिकी पाँटिंग यांच्या मते ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात, वातावरणात खेळण्याचा फायदा मिळेल. पाँटिंग फक्त भारत आणि ऑस्ट्रेलिया बद्दलच बोलले नाहीत. त्यांनी भारत आणि ऑस्ट्रेलियाला इंग्लंडकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मध्ये इंग्लंडचा संघ धोकदायक असल्याचं पाँटिंग म्हणाले.
पाकिस्तानला भाव दिला नाही
टी 20 वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानच्या कामगिरीवरही सगळ्यांच्या नजरा असतील. पण पाँटिंगने पाकिस्तानला जास्त भाव दिला नाही. बाबर आजमची बॅट चालली, तरच पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप जिंकेल, असं पाँटिंग यांना वाटतं.